नवी दिल्ली – देशातील डाव्या विचारसरणीच्या उग्रवादाचा प्रभाव सातत्याने कमी होत असल्याचे संकेत देणारी महत्त्वपूर्ण माहिती केंद्र सरकारने लोकसभेत मंगळवारी मांडली. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले की, सुरक्षा दलांच्या प्रभावी कारवायांमुळे आणि पुनर्वसन उपक्रमांमुळे २०२५ या वर्षात एकूण २,१६७ माओवादी कार्यकर्त्यांनी आत्मसमर्पण केले. २०१९ पासून आजपर्यंत ५,५७१ उग्रवाद्यांनी शस्त्रास्त्रे खाली ठेवली आहेत.
गृहराज्यमंत्री राय यांनी सांगितले की, माओवादी हिंसाचाराचे प्रमाण गेल्या दशकभरात मोठ्या प्रमाणात घटले आहे. २०१० मध्ये डाव्या उग्रवादाशी संबंधित १,९३६ हिंसक घटना नोंदल्या गेल्या होत्या. मात्र, २०२५ मध्ये हा आकडा केवळ २१८ वर आला. यामुळे सरकारच्या सातत्यपूर्ण धोरणांचा आणि संयुक्त सुरक्षा कारवायांच्या अंमलबजावणीचा परिणाम स्पष्ट झाल्याचे त्यांनी नमूद केले.
हिंसक घटनांमध्ये घट झाल्यामुळे नागरिक आणि सुरक्षा दलांच्या मृत्यूंच्या घटनांमध्येही लक्षणीय घट झाली आहे. २०१० मध्ये अशा स्वरूपात १,००५ मृत्यू नोंदले गेले होते. मात्र, २०२५ मध्ये हा आकडा तब्बल ९१% नी कमी होऊन ९३ वर आला आहे. २०१९ नंतर १,१०६ नक्षलवादी ठार, ७,३११ जणांना अटक आणि ५,५७१ जणांनी आत्मसमर्पण केल्याची नोंद आहे.
राय म्हणाले, “या आकडेवारीवरून माओवादी संघटनांची लढाऊ क्षमता जवळजवळ संपुष्टात आली आहे. त्यामुळे त्यांच्या हाती शस्त्रे ठेवून लढा सुरू ठेवण्याचा पर्याय उरलेला नाही.”
सरकारने २०१५ मध्ये आखलेल्या राष्ट्रीय धोरण आणि कृती आराखड्याच्या कठोर अंमलबजावणीमुळे हिंसाचारात सातत्याने घट झाली असून माओवादी प्रभावक्षेत्राचे संकुचन होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमांतर्गत विकासकामे, पायाभूत सुविधा, सुरक्षा दलांची संयुक्त मोहीम आणि उग्रवाद्यांसाठी पुनर्वसन योजना यांचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी नमूद केले.


Leave a Reply