मुंबई : महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि पर्यावरणपूरक हिल स्टेशन म्हणून ओळखले जाणारे माथेरान आता पर्यटकांसाठी नव्या स्वरूपात खुलणार आहे. लवकरच नेरळ ते माथेरान या मार्गावर रोपवे सेवा सुरू होणार असून, त्यामुळे पर्यटकांना अविस्मरणीय आणि रोमांचक प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.
माथेरान हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर संपूर्ण भारतातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. २,६०० फूट उंचीवर वसलेल्या या हिल स्टेशनच्या सौंदर्यात पावसाळ्यात अधिकच भर पडते. दाट धुके, हिरवीगार निसर्गरम्यता आणि कोसळणारे धबधबे यामुळे पर्यटक येथील सौंदर्याचा आनंद लुटतात. विशेष म्हणजे, आशिया खंडातील हे एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशन आहे, ज्यामुळे येथे प्रदूषणमुक्त वातावरण अनुभवता येते.
सध्या नेरळवरून माथेरानला जाण्यासाठी दोन मुख्य मार्ग उपलब्ध आहेत –
टॉय ट्रेन: ही ट्रेन ११ किमीचा प्रवास साधारणपणे अडीच तासांत पूर्ण करते. मात्र, पावसाळ्यात ही सेवा बंद असते. पायी प्रवास: माथेरानच्या पायथ्यापासून पुढील प्रवास पायी करावा लागतो, कारण येथे वाहनांना प्रवेश नाही. नवीन रोपवे सेवा सुरू झाल्यानंतर, हा प्रवास अवघ्या काही मिनिटांत पूर्ण होईल. हा रोपवे आशिया खंडातील सर्वात लांब रोपवे असणार असून, पर्यटकांसाठी हा एक अनोखा अनुभव ठरणार आहे.
केवळ पर्यटकांसाठीच नव्हे, तर स्थानिक रहिवाशांनाही या रोपवेचा मोठा लाभ होणार आहे.
रोजच्या प्रवासासाठी लागणारा वेळ आणि कष्ट मोठ्या प्रमाणात कमी होतील.एमएमआरडीएच्या माध्यमातून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. रोपवे सुरू झाल्यानंतर माथेरानमध्ये पर्यटनाला मोठी चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल. माथेरानचा प्रवास हा नेहमीच निसर्गप्रेमींसाठी अद्वितीय अनुभव राहिला आहे. आता रोपवेच्या माध्यमातून हा अनुभव अधिक वेगवान, रोमांचक आणि अविस्मरणीय होणार आहे. पर्यटक आणि स्थानिक दोघांसाठीही ही सुविधा वरदान ठरणार असून, महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर नवा सोनेरी अध्याय जोडला जाणार आहे.
Leave a Reply