नागपूर : दंगलीत झालेल्या नुकसानाची भरपाई दंगलखोरांकडून करण्यात येईल.त्यांनी पैसे भरले नाही तर त्यांची प्रॉपर्टी विकून भरपाई केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. इतकंच नाही तर दंगलीसबंधी वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्यांना सह आरोपी केलं जाईल, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांनी आज (शनिवारी) दंगलीचा आढावा घेतला. यादरम्यान त्यांनी याबाबत भाष्य केले.
पुढे बोलताना देवंद्र फडणवीस म्हणाले, मी आज नागपूरमध्ये घडलेल्या घटनेचा आढावा मी नागपूरच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून घेतला एकूण घटनाक्रम आणि त्यानंतर केलेली कारवाई या सगळ्या गोष्टींचा हा आढावा होता. मुळातच काही गोष्टी मी सभागृहातही स्पष्ट केल्यात यानुसार, औरंगजेबाची एक प्रतिकात्मक कबर सकाळी जाळण्यात आली. त्यानंतर काही लोकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पण त्यानंतर कबर जाळताना पवित्र कुराणमधील आयती लिहिलेली चादर जाळल्याची अफवा पसरली, काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून
अपप्रचार केला. त्यानंतर सायंकाळी जमाव जमला. या जमावाने तोडफोड केली, जाळपोळ केली, गाड्या फोडल्या लोकांवर हल्ले केले. पोलिसांनी 4-5 तासांतच स्थिती नियंत्रणात आणली. त्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या असतील किंवा इतर प्रकारच्या प्रतिबंधात्मक ज्या गोष्टी करायची गरज होती त्या सर्व गोष्टींचा वापर पोलिसांनी केला, असं ते म्हणाले.
सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडियावरील व्हिडीओ वरून दंगलखोरांची ओळख पटवण्यात येत आहे आत्तापर्यंत १०४ जणांची ओळख पटली असून ९२ जणांना अटक करण्यात आली. आहे त्यामध्ये १२ विधी संघर्ष ग्रस्त बालकांचा समावेश आहे. अजूनही दंगलखोरांची ओळख पटवणे सुरू असून शेवटच्या दंगलखोरला अटक करण्यात येईल, प्रत्येकावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल, असे फडणवीसांनी सांगितले.
Leave a Reply