उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील शेतकरी अजित सिंह यांच्या बँक खात्यात अचनक खरबो रुपये आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही रक्कम किती आहे हे वाचून शेतकरी काय चांगला सुशिक्षित पण सांगू शकणार नाही. कारण ते आकडे पाहून तुम्हीही चक्रावून जाल. सादाबाद तालुक्यातील नगला दुर्जिया गावातील शेतकऱ्याच्या खात्यात तब्बल १० नील १ खरब ३५ अब्ज ६० कोटी १३ लाख ९५ हजार रुपये जमा झाले. इतकी मोठी रक्कम पाहून शेतकऱ्याला धक्काच बसला. त्याने घाईघाईत या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. आता बँकेने या शेतकऱ्याचं बँक अकाउंट फ्रीज केलं असून पोलीस नेमकी इतकी मोठी रक्कम आली कुठून याचा तपास करीत आहेत.
याबाबत अधिक वृत्त असे की, नगला दुर्जिया गावातील शेतकरी अजित सिंह यांच्या बाबतीत हा प्रकार घडला. अजितसिंह यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, २४ एप्रिल रोजी त्यांच्या एअरटेल पेमेंट बँकेच्या खात्यातून १८०० रुपये गायब झाले होते. त्यामुळे ते चिंतेत होते. पण दुसऱ्या दिवशी २५ एप्रिल रोजी बॅलन्स तपासला तेव्हा त्याचे डोळे विस्फारले. खात्यात १०,०१,३५,६०,१३,९५,००० इतके रुपये जमा झाले होते. यावर त्यांचा विश्वास बसला नाही. अजित सिंह यांनी याची माहिती मई पोलिस ठाण्यात दिली.
अजित सिंह यांच्या मते हा प्रकार कुणीतरी सायबर गुन्हेगाराने केला असावा. त्यांच्या खात्यातून पैसे आधी कापले गेले आणि नंतर दुसऱ्याच दिवशी मोठी रक्कम जमा करण्यात आली. हे सर्व त्यांना फसवण्यासाठी केले जात आहे, असा त्यांचा आरोप आहे. त्यांनी या प्रकाराची तक्रार एअरटेल पेमेंट बँकेच्या कस्टमर केअरवर केली आहे. एअरटेल पेमेंट बँकेने सध्या त्यांचे खाते फ्रीज केले आहे. तांत्रिक चुकीमुळे हे घडले का, याचा तपास केला जाणार आहे. अजित सिंह यांनी सायबर सेलमध्येही ऑनलाइन तक्रार केली आहे.
Leave a Reply