मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला आहे. आता राज्यात गारपिटीसह पाऊस तर मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. कारण अवेळी पडणारा पाऊस आणि गारपिटीमुळे फळपिकांवर मोठा परिणाम होतो. मागील काही वर्षात अनेकदा या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. त्यामुळे हवामान विभागाच्या या इशाऱ्याने शेतकरी राजा चिंतेत आहे.
काय आहे हवामान तज्ज्ञांचं म्हणणं?
गेल्या 4- 5 दिवसांपासून मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी कोसळणाऱ्या वळीव पावसाचा वेग आज, गुरुवारीही कायम राहणार आहे. त्यानुसार गुरुवारी मुंबईत जोरदार वाऱ्यासोबत मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर राज्यात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह गारपीट होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ ‘कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. हवामान अभ्यासक अथ्रेया शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार, दक्षिण महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता कायम आहे, तर मुंबईत कोसळणाऱ्या
पावसाचा जोर शक्रवारनंतर ओसरेल.
हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, अवकाळीच्या वातावरणामुळे, कोकण वगळता परंतु मंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दुपारच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा दोन ते चार डिग्रीने घट झाली आहे. त्यामुळे उन्हाचा ताप जाणवत नाही. चंद्रपूर वगळता संपूर्ण विदर्भात ४ ते६ धाराशिव वगळता संपूर्ण मराठवाडा ३ ते ५, जळगाव ६.५, अलिबाग ५.८, डहाणू ५.२, कुलाबा ३.७, सांताक्रूझ २.४ डिग्रीने खालावले. तापमानाची स्थिती १२ मेपर्यंत टिकून रहील. पावसामुळे महामुंबई परिसरातही गारवा पसरल्याने दिलासा मिळाला आहे.
Leave a Reply