बीड: बीडच्या गेवराई तालुक्यातील एका गावामध्ये गोठ्यात बांधून ठेवलेल्या मतिमंद मुलीची एका महिलेच्या जागरुकतेमुळे सुटका झाली आहे. सध्या ही मुलीला छत्रपती संभाजी नगर येथील पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले आहे.. या मुलीच्या आईचा मृत्यू झालेला असून वडील व्यसनाधीन आहे. मुलगी गतिमंद असल्याने तिच्या वडिलाने तिला चक्क जनावरांच्या गोठ्यामध्ये पायाला दोरी बांधून ठेवले होते. गंभीर बाब म्हणजे तिला खाण्यासाठी केळी आणि टरबुजाच्या साली दिल्या जायच्या, अशी माहिती मिळतेय.
रिहनाच्या वडिलाने नैसर्गिक मृत्यू होण्याच्या उद्देशाने तिचे हालहाल केले
रिहानाच्या आईचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. ती गेवराईची होती. व्यसनी वडिलांना रिहाना डोईजड झाली. रिहानाचा नैसर्गिक मृत्यू होण्याच्या उद्देशाने त्याने तिचे हालहाल केले. रिहानाला अक्षरशः जनावरांच्या गोठ्यात पायाला दोरी बांधून ठेवणे सुरू केले. सकस आहार, माणसांच्या सहवासाच्या अभावी रिहानाची बौद्धिक, शारीरिक वाढच झाली नाही. ती बोलू शकत नव्हती. दरम्यान, पैठणच्या हिना नामक महिलेला हे समजले. हिना माहेरी गेलेली असताना तिला सतत रडण्याचा आवाज येत होता. तिने गोठ्यात जाऊन पाहिल्यावर रिहाना दिसली. रिहानाची अवस्था पाहून तिला मायेचा पाझर फुटला. तिने तिच्या वडिलांकडे ताबा मागितला. निर्दयी बापाने बॉण्डवर लिहून देत रिहानाला हिनाकडे सुपुर्द केले.
हिनाच्या घरी आल्यानंतर माणसांमध्ये आलेल्या रिहानाच्या वागण्यात मोठा बदल घडला. अधिक हिंस्त्र झाली होती. इतरांना मारहाण करून, सतत आदळआपट करू लागली. त्यामुळे हिना यांनी हज हाऊसजवळील खालिद अहमद यांच्या अनाथ आश्रमात तिला नेऊन सोडले. खालिद यांनी तिच्यावर उपचार केले. मात्र, आश्रमात सर्व मुलेच असल्याने त्यांनी दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक कांचन मिरधे यांना संपर्क केला. मिरधे यांच्यासह अंमलदार निर्मला निंभोरे, लता जाधव, सरिता कुंडारे, अंबिका दारुंटे, प्रियंका भिवसने, पूजा जाधव, मनीषा बनसोडे परळकर यांनी धाव घेत तिला ताब्यात घेतले.बदल होतोयउपचार, समुपदेशनानंतर रिहानाच्या वागणुकीत बदल होत आहे. ती थोडं थोडं बोलण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. महिला-बाल कल्याण समिती अध्यक्ष ॲड. आशा शेरखाने यांच्या सहकार्याने रिहानाची भारतीय सेवा केंद्र येथे राहण्याची व्यवस्था करून पुनर्वसन केले.
Leave a Reply