नांदेडच्या हदगावात अतिवृष्टी; नाल्यात वाहून तिघींचा मृत्यू

नांदेड : जिल्ह्यात हदगावात नाल्याला अचानक आलेल्या पुरात वाहून माय-लेकीसह पुतणीचा दुर्देवी मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील वरवट गावात ही घटना घडली आहे. ज्यामध्ये सात आणि दहा वर्षीय लहान मुलींचा समावेश आहे. तिघींचे मृतदेह घटनास्थळापासून अर्धा किलोमीटर अंतरावर सापडले आहेत. अरुणा बळवंत शकर्गे (वय ३५), दुर्गा बळवंत शकर्गे (वय १०) आणि समीक्षा विजय शकर्गे (वय ७) अस मयतांची नावे आहेत. शेतातून घरी येतं असताना ही दुर्देवी घटना घडली. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

नांदेड जिल्हात मागील पाच दिवसापासून कधी मध्यम तर कधी मुसळधार पाऊस पडत आहे. मंगळवारी हदगाव तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे वरवट गावातील नाल्याला पूर आला. यादरम्यान अरुणा शकर्गे या लेक दुर्गा आणि पुतनी समीक्षा यांना घेऊन शेतात गेल्या होत्या. पाऊस पडत असल्याने त्या लेकीसह पुतणीला घेऊन परत घराकडे येत होत्या. गावालगत असलेल्या नाल्यातून घराकडे जात असताना अचानक आलेल्या पुरात तिघी वाहून गेल्या. मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच हदगावच्या तहसीलदार सुरेखा नांदे, मनाठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे, मंडळ अधिकारी अरुण गिते, तलाठी हनुमंत बेंबरकर आपल्या टिमला घेऊन तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

प्रशासन आणि गावकऱ्यांनी शोधकार्य घेतला असता यातील दुर्गा शकर्गे हीचा मृतदेह दुपारी अडीच वाजता सापडला. अरुणा शकर्गे आणि अंकिता शकर्गे यांचा शोध पाच वाजेपर्यंत लागला नव्हता. पडत्या पावसात शोधमोहीम युद्ध पातळीवर राबविण्यात आली. शेवटी पथक पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने साडेपाच वाजता अंकिता आणि अरुणा यांचा मृतदेह घटनास्थळाच्या अर्धा किलोमीटर अंतरावर आढळून आला. या घटनेमुळे वरवट परिसरामध्ये दुःखाचे सावट पसरले आहे. पीडित कुटुंबाला मदत मिळवून देण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पीडित कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार बाबुराव कदम यांनी सांगितले.

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *