आषाढी वारीमुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात भक्तीमय वातावरण असताना, दौंड तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. पंढरपूरकडे विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांना अडवून त्यांच्यासोबत लुटमार करण्यात आली, तसेच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे पंढरपूरकडे जाणारे काही वारकरी वाटेत चहा पिण्यासाठी थांबले होते. चहा घेतल्यानंतर ते पुन्हा गाडीत बसत असताना, दोन अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून त्यांच्याजवळ आले. त्यांनी वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावून त्यांच्याजवळील वस्तू लुटल्या. यानंतर, त्यातील एका अल्पवयीन मुलीला काही अंतरावर ओढून नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला.
या घटनेने दौंड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, पोलिसांनी या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे. वारीच्या पवित्र वातावरणात घडलेल्या या घृणास्पद कृत्यामुळे जनमानसात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आरोपींना लवकरात लवकर पकडून त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply