मुंबई: भारताचे सरन्यायाधीश, भूषण गवई यांनी रविवारी मुंबईतील गिरगाव येथील त्यांच्या जुन्या शाळेला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. मराठी माध्यमात शिक्षण घेतल्यामुळे विषयांची समज अधिक घट्ट होते, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. शिक्षणासोबतच संस्कारही रुजतात आणि हेच संस्कार आयुष्यभर साथ देतात, असा आत्मविश्वास गवई यांनी विद्यार्थ्यांना दिला.
सरन्यायाधीश गवई यांनी शाळेतील वर्गखोल्या, वाचनालय, चित्रकला विभाग यांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच, त्यांच्यासोबत शाळेत शिकलेल्या मित्रांशी गप्पा मारून जुन्या आठवणी ताज्या केल्या. आपण आज ज्या उंचीवर पोहोचलो आहोत, त्यामागे आपले शिक्षक आणि शाळेचे फार मोठे योगदान आहे, असे गवई यांनी नमूद केले. याच शाळेतील संस्कारांमुळे आपल्या आयुष्याला योग्य दिशा मिळाली, असे ते म्हणाले. विशेषतः, आपल्या वक्तृत्वाची सुरुवातीची पाऊले याच शाळेच्या व्यासपीठावर पडल्याची आठवण त्यांनी सांगितली. वक्तृत्व स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मिळालेल्या संधींमुळेच आपला आत्मविश्वास वाढला आणि आपण घडलो, असेही गवई यांनी म्हटले.चिकित्सक समूहाचे शिरोळकर विद्यालयाला भेट देत गवई यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतलेल्या या विद्यालयात पुन्हा पाऊल ठेवताना, सरन्यायाधीश गवई यांनी आपली जडणघडण करणाऱ्या
शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रसंगी राज्याचे कौशल्य विकास मंत्री व मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जमादार, चिकित्सक समूहाचे अध्यक्ष किशोर रांगणेकर, सचिव डॉ. गुरुनाथ पंडित, मुख्याध्यापिका संचिता गावडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सरन्यायाधीश भूषण गवई यांची शाळेतील उपस्थिती ही विद्यार्थ्यांसाठी अत्यंत भावनिक, अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण ठरली. एकंदरीत, सरन्यायाधीश गवईंच्या या भेटीने मातृभाषेतून शिक्षण आणि संस्कारांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले.


Leave a Reply