समृद्धी महामार्गावर एका महिन्यात ११ लाख वाहने धावले; ९० कोटी रुपयांचा टोल जमा

मुंबई: नागपूर ते मुंबई दरम्यानच्या समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यापासून, अवघ्या एका महिन्यात या महामार्गावरून तब्बल ११ लाख वाहनांनी प्रवास केला आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) तिजोरीत ९० कोटी रुपयांचा विक्रमी महसूल जमा झाला आहे.
नागपूर ते इगतपुरी हा ६२५ किलोमीटर लांबीचा महामार्ग यापूर्वीच खुला करण्यात आला होता. आता इगतपुरी ते आमणे हा उर्वरित ७६ किलोमीटरचा मार्ग ५ जूनपासून वाहतुकीसाठी खुला झाला आहे. यामुळे राज्याची उपराजधानी नागपूर थेट राजधानी मुंबईशी जोडली गेली आहे. या नवीन टप्प्यामुळे समृद्धी महामार्गाचा वापर करणाऱ्या वाहनांची संख्या लक्षणीय वाढली आहे. ६ जून ते ६ जुलै या कालावधीत एकूण ११ लाख २३ हजार वाहनांनी या महामार्गावरून प्रवास केला आहे.

दररोज ३७ हजार वाहनांची वर्दळ

या कालावधीत आमणे येथील टोल नाक्यावरून १ लाख ९७ हजार वाहनांनी प्रवास केला, तर शहापूरजवळील खुटघर येथील टोल नाक्यावरून २७,६१२ वाहनांनी प्रवास केला. MSRDC च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमणे टोल नाक्यावरून १९ कोटी २० लाख रुपये आणि खुटघर टोल नाक्यावरून ९८ लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. सद्यस्थितीत, या महामार्गावरून दररोज साधारणपणे ३६ हजार ते ३७ हजार वाहने धावत आहेत. सुमारे ६१ हजार कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला ७०१ किलोमीटर लांबीचा हा प्रवेश-नियंत्रित समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई हे अंतर अवघ्या आठ तासांत पूर्ण करण्यासाठी मदत करतो. समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा ११ डिसेंबर २०२२ रोजी सुरू झाला होता. ३ जून २०२५ पर्यंत या महामार्गावरून २ कोटी १२ लाख वाहनांनी प्रवास केला होता, तर आतापर्यंत हा आकडा जवळपास २ कोटी २४ लाखांवर पोहोचला आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *