मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसमध्ये ‘स्वबळा’चा नारा घुमला आहे. आमदार अस्लम शेख आणि आमदार अमीन पटेल यांनी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवावी, अशी मागणी केली आहे. मात्र, पक्षाध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी या मागणीची दखल घेऊन ती दिल्लीतील पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवली जाईल आणि पक्षश्रेष्ठींच्या निर्देशानुसारच मुंबई काँग्रेस निवडणुकीच्या रिंगणात उतरेल, असे स्पष्ट केले आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, पक्षाचे नेते आणि पदाधिकारी ‘स्वबळा’ची मागणी करत असतात. या सर्व भूमिका समजून घेऊन त्या दिल्लीला कळवल्या जातील आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील, त्यानुसारच मुंबई महापालिकेत काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरेल.
‘संविधान जिंदाबाद जनसभा’ मध्ये स्वबळाचा एल्गार
मुंबई काँग्रेसने भायखळा येथे आयोजित केलेल्या ‘संविधान जिंदाबाद जनसभा’ कार्यक्रमातच अस्लम शेख आणि अमीन पटेल यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची मागणी केली. या कार्यक्रमाला काँग्रेसचे राष्ट्रीय अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. माजी मंत्री अस्लम शेख यांनी जाहीर भाषणात म्हटले की, “आम्ही या महाराष्ट्रात, मुंबईत जन्माला आलो याचा आम्हाला गर्व आहे, मराठी आमची भाषा मानतो. पण मराठी बोलायला येत नाही म्हणून कोणाला मारझोड कराल, तर काँग्रेस अशा लोकांसोबत उभी राहू शकत नाही. आम्ही संविधान मानणारे लोक आहोत.”
आमदार अमीन पटेल यांनी आपल्या भाषणातून प्रतापगढी यांना मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आठ दिवस मुंबईत मुक्काम करण्याचे आवाहन केले, जे प्रतापगढी यांनी मान्य केले. पटेल म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत अमीन पटेलसह राज्यात सोळा मतदारसंघात तुम्ही फिरलात आणि ते सगळे जिंकून आले. आता मुंबई महापालिका निवडणुका जवळ येत आहे. मुंबई महापालिकेवर तिरंगा फडकवायचा असेल तर प्रत्येक गल्लोगल्ली इम्रान प्रतापगढी दिसल्यास महापालिकेवर तिरंगा फडकेल आणि मुंबईचा महापौर काँग्रेसचा असेल.”
ते पुढे म्हणाले, “आम्ही मराठी आहोत. मराठी आणि हिंदीत, आई आणि मावशीचे नाते आहे.” त्यांनी कार्यकर्त्यांना दक्षिण मुंबईपासून उत्तर मुंबईपर्यंत स्वबळावर काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचे आवाहनही केले.
एकंदरीत, मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबई काँग्रेसमध्ये ‘स्वबळा’च्या मागणीने पक्षांतर्गत चर्चांना तोंड फुटले आहे. पक्षश्रेष्ठींचा निर्णय आता महत्त्वाचा ठरणार आहे.
Leave a Reply