संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जयंतीनिमित्त सर्व शाळांमध्ये 14 ऑगस्टरोजी पसायदान पठण

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये पसायदानाचे सामूहिक पठण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, शालेय शिक्षण विभागाने येत्या १४ ऑगस्ट रोजी हा उपक्रम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. या उपक्रमाचा मुख्य उद्देश ज्ञानेश्वर माऊलींच्या शिकवणीचा प्रसार करणे आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी पुणे येथील शिक्षण आयुक्तालयाला याबाबत एक पत्र पाठवले आहे. या आदेशानुसार, राज्यातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित, खासगी, महापालिका, जिल्हा परिषद तसेच संस्थात्मक शाळांसाठी पसायदान पठण करणे बंधनकारक असणार आहे.

१४ ऑगस्ट रोजी उपक्रम

गोकुळाष्टमी आणि स्वातंत्र्यदिनामुळे १५ ऑगस्ट रोजी झेंडावंदन, प्रभातफेरी यांसारखे पारंपरिक कार्यक्रम होणार असल्याने, पसायदान पठणाचा कार्यक्रम १४ ऑगस्ट रोजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अनेक शाळांनी या उपक्रमाची तयारी सुरू केली आहे. या उपक्रमाला समाजातील सर्व स्तरांतून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २९ जुलै रोजी या उपक्रमाची घोषणा केली होती, आणि त्यानंतर शिक्षण विभागाने ३१ जुलै रोजी यासंबंधीचे आदेश सर्व शाळांना पाठवले.

शैक्षणिक धोरणांवर भर

याशिवाय, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत विभागाचा आढावा घेतला. शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण बनवण्यासाठी आणि नवीन शैक्षणिक धोरणांची वेळेत अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व शाळांना पूर्वसूचना द्यावी आणि शिक्षकांना योग्य प्रशिक्षण देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल आणि शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. हा उपक्रम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक जीवनात एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो, कारण तो संत ज्ञानेश्वरांच्या विचारांना नवीन पिढीपर्यंत पोहोचवतो.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *