राज्यात नवे 20 जिल्हे व 81 तालुके प्रस्तावित; जनगणनेनंतर होणार निर्णय

चंद्रपूर : महाराष्ट्रात 20 नवे जिल्हे आणि 81 नवे तालुके निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र यावर निर्णय घेण्यासाठी नव्या जनगणनेची आकडेवारी येणे आवश्यक असल्याचे राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. चंद्रपुरात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. बावनकुळे म्हणाले, “राज्यातील लोकसंख्या आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन नवीन जिल्हे व तालुके निर्माण करण्याची गरज आहे. पण जोपर्यंत नवी जनगणना येत नाही, तोपर्यंत कोणताही निर्णय घेता येणार नाही. आकडेवारी आल्यानंतर प्रस्तावावर पुढील विचार होईल.”

नवीन जिल्हे आणि तालुके तयार करण्यामागे प्रशासनिक, सामाजिक, आर्थिक आणि विकासात्मक कारणे महत्त्वाची मानली जातात. मोठ्या जिल्ह्यात प्रशासन पोहोचणे अवघड होते. त्यामुळे नवीन विभाग तयार करून शासकीय योजना अधिक प्रभावीपणे पोहोचवता येतात. तसेच लोकसंख्या वाढ, भौगोलिक विस्तार, दुर्गम भागांपर्यंत पोहोच, आणि स्थानिक विकास या कारणांमुळेही अशा विभागणीची आवश्यकता भासते. नवीन जिल्हा किंवा तालुका झाल्यास त्या भागात नवे रस्ते, दवाखाने, शाळा, सरकारी कार्यालये उभारली जातात. स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतात. सांस्कृतिक व ऐतिहासिक वैशिष्ट्य असलेल्या भागांना स्वतंत्र ओळख मिळते आणि लोकांचे प्रतिनिधित्व वाढते.

यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा समित्यांकडून प्रस्ताव तयार केला जातो. महसूल विभाग त्याचा अभ्यास करतो आणि अखेर मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर अधिसूचना प्रसिद्ध करून अंमलबजावणी केली जाते. राज्यातील नव्या जिल्हे व तालुक्यांच्या प्रस्तावाला अंतिम निर्णय मिळण्यासाठी आता नव्या जनगणनेची आकडेवारी येणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *