भारत स्वतःची ‘सॉव्हरिन एआय’ प्रणाली विकसित करण्यासाठी अत्यंत सक्षम असल्याचे मत एएमडी (Advanced Micro Devices) चे वरिष्ठ उपाध्यक्ष थॉमस झाचेरीया यांनी व्यक्त केले. सुपरकंप्युटिंग इंडिया 2025 या परिषदेदरम्यान ते बोलत होते. झाचेरीया म्हणाले की, “भारताकडे प्रचंड प्रमाणात डेटा हा महत्त्वाचा संसाधन म्हणून उपलब्ध आहे. तसेच देशात संगणन क्षेत्रातील मजबूत पायाभूत सुविधा तयार झाल्या असून त्या ‘सॉव्हरिन एआय’ उभारण्यासाठी आवश्यक असे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत.”
डिजिटल पायाभूत सुविधेत भारताची प्रगती उल्लेखनीय
एएमडीचे झाचेरीया यांनी भारताने डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उभारण्यात अभूतपूर्व कामगिरी केली असल्याचे सांगितले. “भारताने केलेली प्रगती अपेक्षेपेक्षा जास्त आहे,” असे ते म्हणाले.
पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपची गरज
डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि सुपरकंप्युटिंग उभारण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारीची (PPP) आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. “अशी परिसंस्था तयार झाली पाहिजे जिथे सर्वजण योगदान देतील. त्यामुळे विकासाची गती कोणत्याही एकट्या संस्थेपेक्षा अधिक वेगवान होते,” असे झाचेरीया यांनी सांगितले.
भारत जागतिक नेतृत्वाच्या दिशेने
उच्च कार्यक्षम संगणन (HPC), कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि क्वांटम कम्प्युटिंगमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता भारतात असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “सुपरकंप्युटिंग परिषदेत मला जे ऐकायला मिळाले, त्यावरून भारत HPC क्षेत्रातील मोठा खेळाडू बनेल, असा माझा ठाम विश्वास आहे,” असे ते म्हणाले.


Leave a Reply