माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांच्या निधनाने आज एका प्रदीर्घ राजकीय वाटचालीचा शेवट झाला आहे. राष्ट्रीय पातळीवर कायम मोठी पदे भूषविणारे शिवराज पाटील चाकुरकर, कायम कॉंग्रेस ‘हाय कमांड’चे जवळचे नेते म्हणुन प्रसिद्ध होते. उच्चविद्याविभूषित चाकूरकर यांनी,
धोतर-टोपीवाल्या महाराष्ट्राच्या राजकारणात, टापटीप राहण्याची, खासकरून सफारी आणि पांढर्या शुभ्र बुटाची स्टाइल आणली. जिचे पुढे अनुकरण होत राहिले. अर्थात, हीच पॉश राहणीमानाची हौस, २६\११ च्या घटनेच्या दिवशी, जेव्हा ते गृहमंत्री म्हणुन कार्यरत होते, तेव्हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या ‘चिंध्या’ उडवणारी ठरली… देशावर अतिरेकी हल्ला झाल्यानंतर सुद्धा, वारंवार सुंदर कपडे बदलून माध्यमांसमोर जाणारे “भावनाशून्य गृहमंत्री”, “आधुनिक निरो” असा त्यांच्यावर शिक्का बसला होता. ज्यामुळे त्यांचे गृहमंत्री तर गेलेच, शिवाय त्यांचे राष्ट्रीय राजकारणातील महत्व देखील संपले. परिणामी, त्यांच्या घरातील पुढची पिढी कॉंग्रेस सोडून भाजपच्या छत्रछायेखाली उभी राहिलेली त्यांना पहावी लागली.
तर अशा या, सत्तेच्या वर्तुळात कायम महत्त्वपूर्ण जागा पटकावणाऱ्या शिवराज पाटील चाकुरकर यांच्या, १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत अनुभवलेली एक विलक्षण आठवण, आज त्यांच्या निधनाने आठवली.
तो, राजकीय धकाधकीचा काळ होता. १९९५ मध्ये सेना- भाजप युती सत्तेवर आल्याने, शरद पवार पेटून उठले होते.
आपण राष्ट्रीय राजकारण गाजवण्याच्या तयारीत असताना, राज्य हातातून गेले, हे शल्य त्यांना डाचत होते. मुंडे यांचे आक्रमक आरोप त्यांना बोचत होते. त्यामुळेच, पवार यांनी ९८ च्या लोकसभा निवडणुकीत, या शहरी तोंडवळा असणार्या शिवसेना- भाजप युती पक्षांना, ग्रामीण भागातून हद्दपार करण्याचा चंग बांधला होता. तर दुसरीकडे गोपीनाथ मुंडे यांनी भाजपचे जास्तीतजास्त खासदार निवडून आणण्याचे आव्हान स्वीकारले होते. त्यांच्या प्रचाराचा झंझावात सुरूच होता.
राजकीय आरोप- प्रत्यारोप यांनी महाराष्ट्राची निवडणूक गाजत होती. १९९८ च्या निवडणुकीत, तीन टप्प्यांत मतदान होणार होते. त्यामुळे, सर्व प्रमुख नेते आपापला भाग पिंजून काढत होते. तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी मराठवाडय़ातील, पश्चिम महाराष्ट्रातील सभांसाठी एक सहा आसनी हेलिकॉप्टर घेतले होते. त्यामुळे दिवसाला ग्रामीण भागात तीन, चार सभा आणि रात्री शहरी भागातील सभा आणि बैठका असे त्यांचे नियोजन असे. त्यांच्या या संपूर्ण दौऱ्यात “टाइम्स ऑफ इंडिया”चे राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार दिलीप चावरे आणि “लोकप्रभा”तर्फे मी, असे दोनच पत्रकार सलग १९ दिवस सहभागी झालो होतो. त्यातील एक दिवस आम्ही लातूरमध्ये होतो. त्याच दिवशी
शिवराज पाटील चाकुरकर यांच्या प्रचारासाठी शरद पवार येणार होते. मुंडे यांच्या सभेच्या स्थानापासून, चाकूरकर यांच्या सभेचे ठिकाण तासाभराच्या अंतरावर होते. चावरे साहेब यांनी, पवार साहेबांची सभा कव्हर करण्याची इच्छा व्यक्त करताच, मुंडे यांनी हसून मान्यता दिली…
आम्ही सभास्थानी पोहोचलो. पवार येणार असल्यामुळे सभेला चांगली गर्दी झाली होती. चावरे साहेब आणि मी, समोरच उभे होतो. पवारांनी तेव्हढ्या गर्दीत आम्हाला पाहिलं आणि हात केला. तो इशारा समजून चावरे साहेबांनी एका कार्यकर्त्याच्या हाती चिठ्ठी दिली आणि पाच मिनिटांची वेळ मागितली. तो काळ आताच्या एव्हढा “सुरक्षे”चा बाऊ करणारा नव्हता. नेते, लोकांना, पत्रकारांना सहज भेटत. आम्ही ज्या अनोळखी माणसाच्या हाती चिठ्ठी दिली होती, तो पाच मिनिटात आम्हाला शरद पवार यांच्या पाठीमागे उभा असलेला दिसला. त्याने दिलेली चिठ्ठी पवार यांनी वाचली आणि त्याच्या मागे एक ओळ लिहिली, ‘माझे भाषण सुरू झाले की स्टेज जवळ येऊन उभे राहा”. त्यांच्या या तात्काळ प्रतिसादाने आम्ही खुश झालो. आणि पवारांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच स्टेजजवळ जाऊन उभे राहिलो.
जेव्हा सभा संपली तेव्हा, पवार आणि चाकूरकर बोलत बोलत खाली उतरत होते. स्टेजजवळ एक पांढरी कार उभी होती.
ते दोघे थेट त्या गाडीत बसले शिवराज पाटील चाकूरकर गाडी चालवण्यासाठी आणि पवार त्यांच्या शेजारच्या सीटवर. आणि पवारांनी, हाताने खूण करून मला आणि चावरे साहेबांना मागे बसायला सांगितले… आम्ही बसलो, आणि देशाचे राजकारण चालविणारे दोन मोठे मराठी नेते, आमच्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे देऊ लागले… बोलता बोलता ते बाहेरील जनतेचे अभिवादन स्वीकारत होते… आणि आपले उत्तर पूर्ण करत होते… पंधरा- वीस मिनिटे आमचा संवाद सुरू होता. मध्ये मध्ये, आमचे बोलणे थांबायचे, एक दीर्घ ‘पॉझ’ यायचा…त्या दरम्यान पवार आणि चाकूरकर काही सांकेतिक बोलताना दिसायचे… पवार हेलिकॉप्टर मध्ये चढण्याआधी पाच सात मिनिटे, ते दोघे त्याच गांभीर्याने बोलताना दिसले…
पवारांचे ते बोलणे म्हणजे वादळापूर्वीची शांतता आहे, हे आम्हाला एक वर्षाने, जेव्हा त्यांनी सोनिया गांधी यांच्या परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित करून, कॉंग्रेसला रामराम केला, तेव्हा कळले.
ती निवडणूक शिवराज पाटील यांच्या सात सलग लोकसभा विजयांपैकी एक होती. १९८० मध्ये त्यांनी प्रथमच हा लातूर मतदारसंघ जिंकला आणि २००४ पर्यंत — तब्बल सात वेळा, त्यांनी विजयाची मालिका कायम ठेवली. अखेरीस २००४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पराभव भाजपच्या रुपाताई पाटील निलंगेकर यांनी केला.
१९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने महाराष्ट्रात प्रचंड यश मिळवले होते. राज्यातील ४८ लोकसभा जागांपैकी तब्बल ३३ जागा काँग्रेसला मिळाल्या.
ही कामगिरी त्या काळातील काँग्रेसच्या संघटनशक्ती, ग्रामीण भागातील मजबूत आधार आणि भाजप-शिवसेनेविरुद्धच्या राजकीय वातावरणामुळे शक्य झाली होती.
त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे काँग्रेसचे प्रमुख आणि प्रभावी नेते होते. ग्रामीण भागात, विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात, पवार यांच्या प्रभावामुळे काँग्रेसला युती विरोधात लढण्यासाठी मोठा आधार मिळाला होता.
१९९८ च्या निवडणुकीनंतर, अल्पावधीतच १९९९ मध्ये शरद पवार यांनी काँग्रेसमधून वेगळे होत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) स्थापन केला… त्यानंतरचा इतिहास सर्वश्रुत आहे.
आज महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस आहे. त्याच दिवशी शिवराज पाटील चाकूरकर यांनी अखेरचा श्वास घेणे, हा एक वेगळाच योगायोग म्हणावा लागेल…
चाकूरकर साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
महेश म्हात्रे
संपादक- संचालक
महाराष्ट्र रिसर्च सेंटर


Leave a Reply