अहमदाबाद: गुजरातच्या अहमदाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. १३ वर्षांपूर्वी साखरपुडा मोडलेल्या संतापातून एका महिलेने युवकावर गाडी धडकवून चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २२ फेब्रुवारी रोजी जय नावाचा युवक दुचाकीवरून प्रवास करत असताना रिंकी नावाच्या महिलेने त्याला कारने जोरदार धडक दिली. त्यानंतर ती संतापाच्या भरात गाडीतून उतरली आणि “तू माझ्याशी बोलत का नाहीस? माझा नंबर ब्लॉक का केला?” अशी विचारणा करत त्याच्या पोट आणि पाठीवर चाकूने तीन वार केले.
१३ वर्षांपूर्वी मोडला होता साखरपुडा
जय आणि रिंकी यांचा १३ वर्षांपूर्वी साखरपुडा ठरला होता, परंतु कौटुंबिक कारणांमुळे तो मोडला. त्यानंतर २०१६ मध्ये जयने दुसऱ्या मुलीशी विवाह केला, तर रिंकीचाही दुसऱ्या व्यक्तीसोबत विवाह झाला. मागील वर्षी रिंकीने अचानक जयला फोन करून त्यांच्या अपूर्ण नात्याची आठवण काढली. मात्र, जयने तिच्याशी संवाद ठेवण्यास नकार दिला. यानंतरही रिंकी वारंवार कॉल करत राहिली. अखेरीस, तिच्या पतीला या कॉल्सची माहिती मिळाल्याने जयने तिचा नंबर ब्लॉक केला.
२२ फेब्रुवारी रोजी सकाळी रिंकीने जयवर हल्ला केला. मात्र, जय कसाबसा तिथून पळून गेला आणि एका वाहनातून लिफ्ट घेत सुरक्षित स्थळी पोहोचला. त्यानंतर त्याने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, रिंकीचा शोध घेतला जात आहे.


Leave a Reply