मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चा कर्णधार रजत पाटीदारने गुरुवारी नऊ वर्षांनी इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर संघाच्या चाहत्यांचे आभार मानले आणि सांगितले की, आता फक्त एक सामना शिल्लक आहे, आपण एकत्र आनंद साजरा करू. क्वालिफायरमध्ये पंजाब किंग्जचा आठ विकेट्सने पराभव करून आरसीबीने चौथ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याआधी गोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर सलामीवीर फिल साल्ट (नाबाद ५६) ने अर्धशतक झळकावले.
सामन्यानंतर कर्णधार काय म्हणाला?
सामन्यानंतर पाटीदार म्हणाला, “आम्हाला गोलंदाजी कशी करायची याबद्दल आमच्या योजना अगदी स्पष्ट होत्या. वेगवान गोलंदाजांनी खेळपट्टीचा चांगला वापर केला आणि सुयश शर्मानेही चांगली गोलंदाजी केली. तो स्टंपवर गोलंदाजी करतो जी त्याची ताकद आहे. मी त्याला काहीही सांगत नाही कारण मला त्याला गोंधळात टाकायचे नाही.” तो म्हणाला, “प्रत्येक सामन्यात सॉल्ट ज्या पद्धतीने फलंदाजी करतो, ज्या पद्धतीने तो सुरुवात करतो, ते अद्भुत आहे. मी त्याचा चाहता आहे. मी नेहमीच आरसीबी चाहत्यांचे आभार मानतो कारण आम्ही जिथे जातो तिथे आम्हाला ते आमचे मैदान वाटते. अजून एक सामना (फायनल) आहे, आम्ही एकत्र साजरा करू, असं तो म्हणाला.
पराभवानंतरही पंजाब किंग्जला आणखी एक संधी मिळेल
पराभव झाला असला तरी, पंजाब किंग्जला दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील एलिमिनेटर सामन्यातील विजेत्या संघाचा सामना करावा लागणार असल्याने त्यांना अंतिम फेरीत पोहोचण्याची आणखी एक संधी मिळेल.
पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणाला?
पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला, “आम्ही खूप लवकर विकेट्स गमावल्या. नियोजनात कोणतीही चूक नव्हती कारण इथपर्यंत सर्व काही ठीक होते, आम्ही ते अंमलात आणू शकलो नाही. धावसंख्या खूपच कमी असल्याने गोलंदाजांना दोष देता येणार नाही. आम्हाला आमच्या फलंदाजीवर काम करावे लागेल.” आरसीबीसाठी, जोश हेझलवूड (३-२१), भुवनेश्वर कुमार (१-१७) आणि यश दयाल (२-२६) या वेगवान त्रिकुटाने खेळपट्टीचा पुरेपूर वापर केला, तर लेग-स्पिनर सुयश शर्मा (३-१७) ने यजमान संघासाठी अडचणी निर्माण केल्या. सुयश ‘सामनावीर’ ठरला. “जर मी चांगली कामगिरी केली तर लोक आनंदी होतील,” तो म्हणाला. माझी भूमिका स्टंपवर गोलंदाजी करणे आहे, मग ती गुगली असो, लेग स्पिन असो किंवा फ्लिपर असो. आता आपण ३ जून रोजी साजरा करू, असं सुयश म्हणाला.


Leave a Reply