नांदेड : मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा धक्का वडिलांना सहन झाला नाही. त्यांना हृदय विकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. तर मुलगा आणि पतीच्या अकाली निधनाने पत्नीलाही ह्रदयविकाराचा झटका आल्याने सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. मनाला हेलावून लावणारी घटना लोहा तालुक्यातील नसरत सावरगाव येथे घडली आहे. मुला पाठोपाठ वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ सावरगाव येथील बेदरे कुटुंबियांवर आली आहे. या घटनेने कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले असून गावात शोककळा पसरली आहे. राहुल बेदरे (वय २७) आणि भीमराव बेदरे (वय ६०) असे मृत वडिल आणि मुलाचे नाव आहे.
सावरगाव येथील भीमराव बेदरे यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांना चार एकर कोरडवाहू शेती आहे. राहुल हा एकुलता एक मुलगा होता. तो शेतीसह मिळेल ते काम करत वडिलांना हातभार लावत होता. सोमवारी त्याने दिवसभर आपल्या मित्रांसोबत रोजदांरीने ट्रकमध्ये कापूस भरण्याचे काम केले. त्यानंतर पेरणीसाठी खत आणि बी बियाणी आणतो म्हणून निघून गेला. मात्र, शेतातील झाडास गळफास घेऊन त्याने जीवनयात्रा संपवली. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र, स्पष्ट झाले नाही. मात्र कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची त्याचे कुटुंबीय सांगतायत.
दरम्यान, मुलाने उचललेल्या टोकाच्या पाऊलाने वडिल भीमराव बेदरे यांना धक्का बसला होता. मंगळवारी त्याच्या अंत्यविधीनंतर घरी परतताच वडिल भीमराव बेदरे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. मात्र घरी आल्यानंतर गुरूवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास पुन्हा त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांची प्राणज्योत मालवली. मुलगा आणि पती यांच्या निधनाचा विरह पत्नीलाही असाह्य झाला. तिला ही हृदयविकाराचा झटका आला नातेवाईकांनी तत्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
पत्नीला पतीचे, मुलाचे अंतिम दर्शनी ही घेता आले नाही
पती भीमराव आणि मुलगा राहुल यांच्या अकाली निधनाचा विरह पत्नी शोभाबाई बेदरे यांना असह्य झाला. त्यांनाही हृदयविकाराचा धक्का बसला असून, नातेवाईकांनी त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने, त्यांना पती आणि मुलाचे अंतिम दर्शनही घेता आले नाही. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. एकाच कुटुंबातील दोघांच्या निधनाने सावरगाव गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भीमराव यांनी आपल्या शेतीच्या भरोशावर दोन्ही मुलींची लग्नं केली होती. आता मात्र, या दुहेरी आघाताने बेदरे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गावावर शोककळा पसरली आहे.
Leave a Reply