धारावीवरून मंत्री आशिष शेलार आणि काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. नुकतंच धारावी मास्टर प्लॅनवरून वर्षा गायकवाड यांनी सत्ताधाऱ्यांना घेरत काही प्रश्न उपस्थित केले होते. याला प्रत्युत्तर देत मुंबई भाजपा अध्यक्ष आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी एकाही धारावीकराला बेघर केले जाणार नाही आणि तशी ग्वाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिल्याचे स्पष्ट केले. महाविकास आघाडीच्या काळात अपात्र ठरवलेल्या नागरिकांनाही आताच्या प्रक्रियेत समाविष्ट केले जाणार आहे, असे सांगत शेलार यांनी स्थानिक आमदार, खासदारांनी राजकीय स्वार्थासाठी लाखो धारावीकरांच्या भवितव्याशी खेळ सुरू केला आहे आणि अपप्रचार करून प्रकल्पात अडथळे आणले जात आहेत, असा आरोप केला.
मुंबई महापालिका निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, भाजपा आणि काॅंग्रेस आत्तापासूनच प्रचाराला लागल्याचे चित्र दिसत आहे. मुंबई भाजपा आणि काँग्रेस अध्यक्षांमध्ये धारावी पुनर्वसन विषयांवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत.शेलार यांनी म्हटले की, काँग्रेस सरकारच्या काळात केवळ आश्वासने दिली गेली आणि प्रकल्प रखडवला. सरकारने मास्टर प्लॅन तयार केल्यानंतर आता त्याविषयी अफवा, गैरसमज पसरवण्याचे षडयंत्र सुरू झाले आहे.
‘वर्षा गायकवाड यांचा प्रतिहल्ला’
या टीकेला प्रत्युत्तर देताना मुंबई काॅंग्रेसच्या अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड यांनी शेलार यांच्यावर थेट घणाघात केला. शेलार आणि त्यांचे सरकार केवळ कोणाचे एजंट बनून काम करत आहेत, हे जनता चांगलं जाणते. ‘गरीब हटाओ, धारावी मिटाओ, अदानी सिटी बनाओ’ हाच त्यांचा अजेंडा आहे. आम्ही धारावी व मुंबईच्या न्याय-हक्कांची लढाई लढत आहोत आणि ते अदानीचे खिसे भरण्यासाठी मुंबई व महाराष्ट्राला लुटत आहेत. माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे, विषयांना बगल देऊ नका. जनतेच्या प्रश्नांची उत्तरं द्या, असे आव्हान खा. गायकवाड यांनी दिले. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या राज्य शासनाने मंजूर केलेल्या मास्टर प्लॅनवर तसेच धारावीतील एफएसआय, टीडीआर, झोपडीधारकांचे सर्वेक्षण यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
Leave a Reply