अमरावती : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे आता विधान परिषदेच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे.विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागणारे बच्चू कडू गेल्या काही दिवसांपासून अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. यातच आता आपण या संदर्भात शिक्षकांशी चर्चा करून त्यानंतरच निर्णय घेणार असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता पुढील वर्षी होणार्या या निवडणुकीत बच्चू कडू पुन्हा एकदा विधान परिषदेच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघात बच्चू कडू हे सलग चार वेळा निवडून आले होते. त्यांनी 2004, 2009, 2014 आणि 2019 या काळात सलग या मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे ते आता शिक्षक मतदार संघातून पुन्हा एकदा विधिमंडळात जाण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे.
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघात अपक्ष आमदार किरण सरनाईक यांचे वर्चस्व आहे. किरण सरनाईक यांचा कार्यकाळ हा 6 डिसेंबर 2026 रोजी संपणार आहे. त्यामुळे आता या मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणूक होणार आहे. त्यातच अमरावती मध्ये नुकत्याच पार पडलेल्या प्रहार शिक्षक संघटनेच्या मेळाव्यात मतदारसंघातून बच्चू कडू यांनी निवडणूक लढवावी, असा असा आग्रही पदाधिकाऱ्यांनी केला होता. त्याला बच्चू कडू यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र आपण शिक्षकांशी चर्चा केल्यानंतरच या संदर्भात निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Leave a Reply