मुंबई : महाराष्ट्रातील भाजप आता कोणाच्याही “कुबड्यांवर” अवलंबून नसून स्वतःच्या बळावर मजबूत आणि सक्षम पक्ष म्हणून उभा राहिला आहे, असे सूचक विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, हे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे निर्देशित असल्याची चर्चा रंगली आहे.
मुंबईत सोमवारी आयोजित कार्यकर्ते मेळाव्यात अमित शहा यांनी पक्षाच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारीचा धडाका उडवला. “विरोधकांना नेस्तनाबूत करा, त्यांच्या दुर्बलतेवर वार करा, पण आपण दुर्बलतेतून कोणी पडू नये,” असा संदेश देत शहा यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवउर्जा ओतली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “भाजपने नेहमी नीतीच्या आधारे राजकारण केले असून देशातील नागरिकांच्या हितासाठी सातत्याने काम केले आहे. महाराष्ट्रात भाजप चौथ्या क्रमांकावरून आता प्रमुख आणि शक्तिशाली पक्ष बनला आहे.”
२०१९ मध्येही शहा यांनी राज्यात भाजप स्वबळावर सत्तेत येईल, असे विधान केले होते. त्यामुळे या नव्या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देतानाच त्यांनी विरोधकांवर थेट हल्ला चढवला. त्यांनी सांगितले की, “भाजप ही केवळ सत्तेसाठी नव्हे, तर विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी लढणारी संघटना आहे.”
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहा यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, “भाजपचे सहकारी पक्ष हे आमच्या कुबड्या नसून, आमचे मित्र आहेत.”
अमित शहा यांच्या या भाषणाने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, राज्यातील राजकीय समीकरणांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. स्वबळावर निवडणूक लढवण्याचा संदेश देत शहा यांनी महाराष्ट्रातील आगामी राजकारणात नव्या दिशेचा संकेत दिला आहे.


Leave a Reply