नवी दिल्ली : पुर, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या राज्यांना तातडीने मदत म्हणून केंद्र सरकारने मोठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित सजग यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी एसडीआरएफच्या वाटपाचा दुसरा हप्ता जाहीर केला. या अंतर्गत महाराष्ट्राला १,५६६.६० कोटी रुपये आणि कर्नाटकला ३४८.४० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत शेती, रस्ते आणि जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. त्यामुळे या निधीमुळे राज्य सरकारला आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत पुरविणे शक्य होणार आहे. केंद्र सरकारने एसडीआरएफ आणि एनडीआरएफ अंतर्गत यंदा २७ राज्यांना १३,६०३ कोटी रुपये आणि १५ राज्यांना २,१८९ कोटी रुपये दिले आहेत. तसेच, राज्य आपत्ती निवारण निधीतून २१ राज्यांना ४,५७१ कोटी रुपये आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून नऊ राज्यांना ३९२ कोटी रुपये देण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार पूर, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे बाधित झालेल्या राज्यांना सातत्याने मदत करत आहे. “केंद्र सरकारने आज दिलेला दुसरा हप्ता ही अग्रिम मदत आहे. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
ही मदत मिळाल्यानंतर राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त भागातील पुनर्वसन व मदतकार्याला गती मिळणार आहे. शेतकरी, नागरिक व पायाभूत सुविधांचे नुकसान भरून काढण्यासाठी ही रक्कम अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या या मदतीमुळे महाराष्ट्राच्या आपत्ती व्यवस्थापनाला मोठा दिलासा मिळाला आहे.


Leave a Reply