महाराष्ट्र सरकारने मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत e-बाईक टॅक्सी सेवेला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे मुंबईत १०,००० आणि उर्वरित महाराष्ट्रातही १०,००० नोकऱ्यांच्या संधी निर्माण होणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, या सेवेमुळे नागरिकांना कमी खर्चात प्रवास करण्याची सुविधा मिळणार आहे. जिथे आधी एका प्रवासासाठी १०० रुपये खर्च येत होते, तिथे आता तोच प्रवास फक्त ३० ते ४० रुपयांत होणार आहे. मात्र, यासंबंधीचे अंतिम दर अद्याप निश्चित झालेले नाहीत.
पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी फक्त e-बाईक टॅक्सीना परवानगी दिली जाईल, असे सर्णाईक यांनी स्पष्ट केले. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेषतः महिलांसाठी, नियमावली तयार केली जात आहे. महिलांना महिला चालक निवडण्याचा पर्यायही उपलब्ध करून दिला जाणार आहे.
या नव्या धोरणामुळे राज्यभरात जवळपास २०,००० लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. मुंबईसाठी १०,००० आणि इतर शहरांसाठीही तितक्याच संधी निर्माण होतील. याशिवाय, रिक्षाचालकांच्या मुलांनी e-बाईक टॅक्सी व्यवसाय सुरू करावा, यासाठी सरकार १०,००० रुपयांचे अनुदान देण्याचा विचार करत आहे. उर्वरित भांडवल बँक कर्जाद्वारे उभारता येईल.
सुरुवातीच्या नियोजनानुसार, e-बाईक टॅक्सी १५ किमी पर्यंत सेवा देऊ शकतील. तसेच, प्रवाशांच्या सोयीसाठी खासगी दुचाकींसाठीही बाईक पूलिंगचा पर्याय मंजूर करण्यात आला आहे. मात्र, या वाहनांकडे वैध फिटनेस प्रमाणपत्र, परवाना आणि विमा असणे आवश्यक राहील. दर ठरवण्याचा अधिकार संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे (RTA) राहील. वाहतूकतज्ज्ञ ए. व्ही. शेनॉय यांच्या मते, मुंबईतील अरुंद रस्ते आणि आधीच वाढलेली वाहतूक लक्षात घेता, e-बाईक टॅक्सींची संख्या नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. काही e-बाईक वेगाने मर्यादित असतात, त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी स्वतंत्र बाईक कॉरिडॉर निर्माण करणे योग्य ठरेल, असे त्यांनी सुचवले.
कोण चालवू शकतील e-बाईक टॅक्सी?
फक्त २० ते ५० वयोगटातील चालकांनाच e-बाईक टॅक्सी चालवण्याची परवानगी असेल. महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष तरतुदी करण्यात येणार आहेत आणि महिला प्रवाशांना महिला चालक निवडण्याचा पर्याय दिला जाईल. या नव्या निर्णयामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कमी किमतीत, वेगवान आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. तसेच, हजारो नव्या रोजगार संधी आणि रिक्षाचालकांच्या कुटुंबांसाठी नव्या व्यवसायाची दारे उघडली जाणार आहेत.
Leave a Reply