माहीममध्ये पर्यावरणस्नेही पुढाकार : वाढत्या उष्णतेला रोखण्यासाठी पावसाळी वृक्षारोपणाची जय्यत तयारी

उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानाचा सामना करण्यासाठी माहीममधील स्थानिक नागरिकांनी पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेतला आहे. ‘माहीम रेसिडेंट्स ग्रुप’ या स्थानिक रहिवाशांच्या गटाने आगामी पावसाळ्यात वृक्षारोपणासाठी जागा निश्चित करण्याचे काम सुरू केले असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही ही मोहीम उत्साहात राबवली जात आहे. गेल्या १५ वर्षांपासून, या गटाने बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या सहकार्याने जी (उत्तर) वॉर्ड अंतर्गत माहीम परिसरात सुमारे १,००० झाडे लावली आहेत. गटाचे सक्रिय सदस्य इरफान माचीवाला सांगतात की, “फक्त जागा ठरवणे एवढ्यावर आम्ही थांबत नाही, तर नागरिकांना झाडांचे महत्त्व समजावून देणे आणि त्यांच्या सहभागातून वृक्षसंवर्धनाला चालना देणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.” माचीवाला सांगतात की, अनेक वेळा दुकानदारांना झाडांमुळे दुकानाचे बोर्ड झाकले जाण्याची भीती वाटते किंवा ग्राहकांच्या ये-जा मध्ये अडथळा निर्माण होतो, त्यामुळे ते विरोध दर्शवतात. काही रहिवासी आणि फेरीवालेही फूटपाथवर झाडांची लागवड नकोशी मानतात. “अशावेळी आम्ही त्यांच्याशी संवाद साधतो, त्यांचा विश्वास संपादन करतो आणि झाडांच्या देखभालीसाठी त्यांना सहभागी करतो,” असे ते स्पष्ट करतात. या उपक्रमात फारुख धाला देखील महत्त्वाची भूमिका बजावत असून, “महापालिकेकडून सर्व आवश्यक परवानग्या घेऊन, पावसाळ्याच्या सुरुवातीला योग्य ठिकाणी रोपांची लागवड केली जाते,” असे ते सांगतात. गटाच्या मते, महापालिकेने सहा फूटांपेक्षा अधिक उंचीच्या रोपांची लागवड सुरू केल्याने त्यांचे जगण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. मात्र उन्हाळ्यात झाडांना पाणी देणे आणि देखभाल करणे आवश्यक असते. ह्या काळात महापालिकेची सक्रियता कमी असल्याने, गटाने स्थानिक नागरिकांना वृक्षसंवर्धनात सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

“वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी झाडे हा एक सर्वात प्रभावी आणि नैसर्गिक उपाय आहे,” असे माचीवाला सांगतात. “मुंबईतील अनेक जुन्या वस्त्यांमध्ये, विशेषतः मुस्लीम बहुल भागांमध्ये, झाडांची संख्या अत्यल्प आहे, त्यामुळे तिथे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवते.” शहरात झपाट्याने वाढणाऱ्या काँक्रीटच्या पायाभूत सुविधांमुळे, दाट वस्त्यांमध्ये वायुवीजनाचा अभाव आहे. त्यामुळे उष्णतेचा प्रभाव अधिक तीव्र होतो. अशा भागांमध्ये झाडांचे अस्तित्व हवामान नियंत्रक म्हणून काम करते.

स्थानिक प्रजातींच्या झाडांची रस्त्यांच्या कडेला नियोजनबद्ध लागवड आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग हे शहरी वनीकरणासाठी आवश्यक घटक ठरत आहेत. यामुळे केवळ सध्याच्या उष्णतेपासून दिलासा मिळत नाही, तर भविष्यातील हवामान बदलांपासून संरक्षण मिळण्यास मदत होते. “लोकांच्या विचारसरणीत आता सकारात्मक बदल दिसून येत आहे. वारंवार भासत असलेल्या उष्णतेच्या लाटा आणि त्याचा अनुभव यामुळे अधिकाधिक लोक झाडांच्या गरजेबाबत जागरूक होत आहेत,” असे माचीवाला शेवटी म्हणाले.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *