“४२ लाख नव्या मतदारांमागचं सत्य शोधा”, उद्धव ठाकरे यांचं शिवसैनिकांना आवाहन

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत मोठ्या प्रमाणात गोंधळ होत असल्याचे आरोप होत आहेत. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना जागरूकतेचे आदेश दिले आहेत. “डोळ्यात तेल घालून मतदार तपासा. गेल्या निवडणुकीत सुमारे ४२ लाख मतदार वाढले. त्यात नेमके कोण घुसखोर आहेत, याचा शोध घेणे आवश्यक आहे,” असे आवाहन त्यांनी केले. ठाकरे मुंबईतील शाखांच्या दौर्‍यावर असून रविवारी दहिसर येथे त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी स्पष्ट केले की, सण-उत्सव जरी असले तरी कामात कसूर चालणार नाही. आजपासूनच प्रत्येक गटप्रमुख आणि कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील मतदारयादी तपासावी. घराघरात जाऊन नागरिकांना भेटावे. आपल्या वॉर्डात मतदार चोरी किंवा बोगस नावे घुसली आहेत का, याची खात्री करून घ्यावी. अन्यथा निवडणुकीच्या दिवशी आपल्यालाच फटका बसू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.

“आपल्या भागात नसलेले मतदार, दुसऱ्या नावाने मतदान करताना दिसतात. मागच्या वेळेसही काही ठिकाणी दुबार व बोगस मतदान झालं. यावेळी ते टाळण्यासाठी आत्ताच सज्ज व्हा,” असे ठाकरे म्हणाले. त्यांनी कार्यकर्त्यांना जबाबदारीची जाणीव करून देत सांगितले की, आजपासून प्रत्येकाने कामाला लागले पाहिजे. दरम्यान, गणेशोत्सवानंतर येणाऱ्या पितृपक्षाचा उल्लेख करताना ठाकरे म्हणाले, “माझा पक्ष हाच पितृपक्ष आहे. माझ्या पित्याने शिवसेनेची स्थापना केली. ज्या लोकांना काही काम नाही, ते सगळं चौकशीचं करतात,” असा टोला त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना लगावला. महापालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदारांना रोखण्यासाठी कार्यकर्त्यांनी सजग राहण्याची हीच वेळ असल्याचे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे स्पष्ट केले.

 

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *