‘जीबीएस’मुळे मृत्यूची मालिका सुरुच; देशभरातील मृत्यूसंख्या २१ वर

गुइलेन-बैरे सिंड्रोमच्या सध्याच्या साथीमुळे देशभरातील मृत्यूंची संख्या २१ वर पोहोचली आहे. सोमवारी पुणे आणि नागपूर येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. यासह, महाराष्ट्रातील गुइलेन-बैरे सिंड्रोममुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १७ वर पोहोचली आहे. तर आंध्र प्रदेश, आसाम, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

पुण्यात ३४ वर्षीय तर नागपुरात ८ वर्षीय मुलाचा मृत्यू
पुण्यातील वाघोली येथे राहणाऱ्या ३४ वर्षीय रुग्णाचा शनिवारी सायंकाळी ससून रुग्णालयात मृत्यू झाला. महाराष्ट्र आरोग्य विभागाने सोमवारी याची अधिकृत नोंद घेतली. जानेवारी ५ पासून पुण्यात गुइलेन-बैरे सिंड्रोमच्या उद्रेकानंतर आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी सांगितले की, हा रुग्ण ३ फेब्रुवारीला एका खाजगी रुग्णालयातून ससूनमध्ये हलवण्यात आला होता. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला हातापायात मुंग्या येणे आणि कमकुवतपणा जाणवणे अशी लक्षणे दिसली. फक्त सहा तासांत हा कमकुवतपणा हातांपर्यंत पोहोचला. पुढील तीन दिवसांत तो वाढत जाऊन ८ फेब्रुवारीपर्यंत गळा, श्वसन आणि चेहऱ्याच्या स्नायूंवर परिणाम झाला, ज्यामुळे गिळण्यासही त्रास होऊ लागला. त्यानंतरही रुग्णाची तब्येत सुधारली नाही आणि अखेरीस त्याचा मृत्यू झाला. नागपुरातही एका ८ वर्षीय मुलाचा गुइलेन-बैरे सिंड्रोममुळे मृत्यू झाला. या रुग्णाला १६ जानेवारी रोजी नागपूरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर १० फेब्रुवारी रोजी त्याचा मृत्यू झाला. नागपुरात हा दुसरा मृत्यू आहे.
दरम्यान, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सोमवारी गिलियन-बॅरे सिंड्रोमच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही भागांत प्रवास निर्बंध लावण्याची शक्यता व्यक्त केली.“हा आजार एका भागातून दुसऱ्या भागात पसरत असेल, तर प्रवास निर्बंध लागू करणे आवश्यक ठरू शकते,” असे जाधव यांनी बुलडाणा येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *