रेल्वे स्थानकांच्या १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांवर बंदी; पियुष गोयल यांची महत्त्वपूर्ण माहिती

मुंबईतील प्रमुख उपनगरीय रेल्वे स्थानकांभोवती फेरीवाल्यांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आणि रेल्वे प्रशासनाने याबाबत एकत्रितपणे काम सुरू केले आहे. बोरिवली स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांना हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, तसेच मालाड, कांदिवली आणि दहिसर स्थानकांच्या १५० मीटर परिसरातही अशीच कारवाई लवकरच केली जाणार असल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केले.

शनिवारी बीएमसी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत गोयल म्हणाले, “बोरिवली, मालाड, कांदिवली आणि दहिसर स्थानकांभोवतीचा १५० मीटरचा परिसर फेरीवाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येईल.” तसेच, त्यांनी पुढे सांगितले की, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करून अमृत भारत योजनेअंतर्गत या स्थानकांचा पुनर्विकास करण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बंद असलेल्या मिनी ट्रेनविषयी गोयल यांनी सांगितले, “या प्रकल्पाबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली होती. त्यानुसार, एक वर्षापूर्वीच या कामाला पुन्हा प्रारंभ झाला असून पुढील दोन महिन्यांत ही ट्रेन पुन्हा सुरू केली जाईल.”

बैठकीदरम्यान पायाभूत सुविधांच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. मालवणी आणि गोराई भागांतील खारफुटीच्या जमिनीवर होणाऱ्या कचराफेकीवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश गोयल यांनी दिले. भूमाफियांकडून खारफुटीवर ट्रकद्वारे सतत कचरा टाकला जात असल्याचे सांगत गोयल यांनी बीएमसी व पोलिसांना अतिक्रमण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यास सांगितले. अंबुजवाडी आणि अक्सा येथे दोन नवीन पोलिस ठाणी उभारण्याचा प्रस्तावही यावेळी दिला.

एमएमआरडीएच्या बोरिवली-ठाणे बोगदा प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या सुमारे ३५० प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित आहेत. “त्यांना एसआरए अंतर्गत पुनर्वसनासाठी तातडीने घरांची व्यवस्था केली जावी,” असे निर्देश गोयल यांनी दिले.

त्याचप्रमाणे, गोयल यांनी उत्तर मुंबईतील ११ तलावांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रस्ताव पुढे नेण्यावर जोर दिला. हे तलाव सध्या अतिक्रमणाखाली असून, त्यांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.

शेवटी, उत्तर मुंबईतील सर्व स्मशानभूमींची तातडीने तपासणी करून, आवश्यक ठिकाणी दुरुस्ती, नूतनीकरण आणि प्रदूषण कमी करण्यासाठी विद्युत भट्ट्यांची बसवणूक करण्याचे निर्देश गोयल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *