नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना स्वातंत्र्यदिनानिमित्त एक मोठा दिलासा दिला आहे. बँकेने गृहकर्ज आणि कारसाठी संबंधित कर्जाचे व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ज्या ग्राहकांनी पूर्वी फ्लोटिंग रेटवर कर्ज घेतले आहे, त्यांच्या कर्जाचा हप्ता किंवा कर्जाचा कालावधी कमी होऊ शकतो. या निर्णयाचा फायदा नवीन कर्ज घेणाऱ्यांनाही होणार असून त्यांना स्वस्त दरात कर्ज मिळेल.
एमसीएलआरमध्ये घट:
एसबीआयने विविध मुदतींसाठी निधी आधारित कर्जदर ५ बेसिस पॉइंट्सने कमी केला आहे. हा सुधारित दर १५ ऑगस्टपासून लागू झाला आहे. विशेष म्हणजे, ऑगस्ट महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात कोणताही बदल केला नव्हता, तरीही एसबीआयने हा निर्णय घेतला आहे. या बदलामुळे एमसीएलआर दर आता ७.९० टक्के आणि ८.८५ टक्क्यांच्या श्रेणीत राहील, जो यापूर्वी ७.९५ टक्के आणि ८.९० टक्के होता. एमसीएलआर कमी झाल्याने, त्याच्याशी जोडलेली सर्व कर्जे स्वस्त होतील.
ऑनलाईन शुल्कात बदल
एसबीआयने इंटरनेट बँकिंगद्वारे पैसे पाठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘इमीडिएट पेमेंट सर्व्हिस’ सेवेच्या शुल्कातही बदल केला आहे. सामान्य ग्राहकांसाठी नवीन नियम १७ ऑगस्टपासून तर, कॉर्पोरेट ग्राहकांसाठी ८ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.
नवीन शुल्क दर (IMPS)
* २५,००० रुपयांपर्यंत: शुल्क नाही.
* २५,००१ ते १ लाख रुपयांपर्यंत: २.१ जीएसटी.
* १,००,००१ ते २ लाख रुपयांपर्यंत: १.६ जीएसटी.
* २,००,००१ ते ५ लाख रुपयांपर्यंत: १.० जीएसटी.
हा निर्णय सर्वसामान्यांसाठी एक मोठा दिलासा असून, यामुळे कर्जाच्या हप्त्यांवरचा ताण कमी होण्यास मदत होईल.
Leave a Reply