नाशिक : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि वादग्रस्त वक्तव्य हे एक समीकरण बनले आहे. त्यांनी आणखी वादग्रस्त वक्तव्य केले आहे, ज्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. ते म्हणाले,
हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? असा उलट सवाल त्यांनी शेतकऱ्यांना केला आहे. अवकाळी पावसाने नाशिकमधील कांदा, द्राक्षे आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत कृषी मंत्र्यांचे हे वक्तव्य शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे ठरलेय. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावात अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेय.शेतात असलेले कांद्याचेच फक्त पंचनामे होणार, घरात असलेल्या कांद्याचे होणार नाहीत, ते नियमात बसत नाही. उभ्या पिकांचे रीत सर पंचनामे होतील, असेही कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. माणिकराव कोकाटे आज नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीची पाहणी करण्यासाठी पोहचले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलेय.
मागील आठवडाभरात महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतात असणारे पिके सडली गेली. कांदा, आंबा भुईमुंगाच्या शेंगासह सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आळेला घास पावसामुळे हिरावला गेल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. फडणवीस सरकारकडून नुकसान झालेल्यांना भरपाई मिळेल, अशी घोषणा करण्यात आली. लवकरच नुकसानीचे पंचनामे केले जातील, पण त्याआधीच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानामुळे वाद उफाळलाय. कोकाटे यांनी यापूर्वीही शेतकऱ्यांना भिकारी संबोधून आणि कर्जमाफीच्या रकमेचा वापर लग्नासाठी होतो, असे विधान करून वाद ओढवून घेतला होता. या ताज्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षांनी आणि शेतकरी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, कोकाटे यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचा दावा केला आहे.
Leave a Reply