मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे 14 जून रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक मुंबईत त्यांच्या घरी शिवतीर्थ येथे येत असतात. मात्र यंदा आपण 14 जून रोजी मुंबई बाहेर असल्याचं सांगत कोणीही शिवतीर्थावर येऊ नये असे आवाहन राज ठाकरे यांनी एका पत्राद्वारे केले आहे. वाढदिवस साजरा न करण्याला कुठलाही अर्थ काढू नये असे देखील राज ठाकरे म्हणाले आहेत. मात्र पत्रात त्यांनी आपण लवकरच भेटू असे देखील मनसैनिकांना सांगितले आहे. हल्ली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची बातम्या समोर येत आहेत. त्यात राज यांचं कार्यकर्त्यांना भेटू असे सांगणे, भविष्यातील राजकीय घडामोडी घडण्याचे संकेत आहेत का? अशी कुजबुज सुरू आहे.
राज ठाकरे यांचं मनसैनिकांना लिहलेले पत्र खालीलप्रमाणे
सस्नेह जय महाराष्ट्र
येत्या १४ जून २०२५ ला म्हणजे अर्थातच माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपली भेट होणे शक्य नाही, कारण या दिवशी मी सहकुटुंब मुंबई बाहेर जात आहे. तुमच्या आणि किंवा इतरांच्या मनात हा प्रश्न येईल की मी वाढदिवस साजरा का करणार नाहीये ? काही विशेष कारण आहे का? इत्यादी- पण मनापासून सांगतोय की खरतर असे कोणतेच कारण नाहीये, त्यामुळे येत्या १४ जूनला तुम्हाला भेटता येणार नाही. याचे कोणतेही अर्थ काढू नका.
गेली अनेक दशके माझ्या वाढदिवसाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही सगळे जण येता, तुमच्याशी त्या दिवशी बोलणे होत नाही पण तुमचे दर्शन, तुमच्या अनेकांशी होणारी भेट हि ऊर्जा देणारी असते. मी आयुष्यात सर्वात जास्त काही कमावले असेल तर तुम्हा सर्वांचं अफाट प्रेम हे आणि या प्रेमाबद्दल मी तुमचा आयुष्यभर ऋणी आहे आणि पुढे देखील राहीन. या वाढदिवसाला तुमची भेट होणार नाही, यामुळे त्यांची मला रुखरूक लागेलच! पण लवकरच मी तुमच्या भेटीला येईन. महाराष्ट्र सैनिकांना भेटायला. त्यांचे दर्शन घ्यायला म्हणून भी येईन तेव्हा आपली भेट होईलच बाकी तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत आहेतच आणि त्या कायम राहतील याबद्दल तिळमात्र शंका माझ्या मनात नाही. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही तुमच्या भागात काही लोकोपयोगी कार्यक्रम राबवलेत तरी माझा वाढदिवस तुम्ही साजरा केलात असं मी मानेन. त्यामुळे या वर्षी शिवतीर्थावर येऊ नका. आपण लवकर भेटू, महाराष्ट्राची, मराठी माणसाची तसेच तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची काळजी घ्या.
Leave a Reply