मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे आश्वासन; “जर स्मारक भव्य झाले नाही, तर माझे नाव बदला!”

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे झालेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या वेळी त्यांनी मोठे विधान करत, महाराष्ट्र सरकार आग्रामधील मीना बाजार (पूर्वीची कोठी) येथील ऐतिहासिक जागा अधिग्रहित करून तेथे भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा केली.
कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, छत्रपती शिवाजी महाराजांना बंदी ठेवण्यात आलेल्या कोठडीच्या जागेवर भव्य स्मारक उभारले जाईल. या संदर्भात ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, “हे स्मारक इतके भव्य असेल की, ताजमहाल पाहण्यासाठी जेवढी गर्दी होते, त्याहून अधिक लोक येथे येतील. जर तसे झाले नाही, तर माझे फडणवीस हे नाव बदलून टाका!” असे धडाकेबाज आव्हान त्यांनी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांच्या त्यागाचे स्मरण करत, “शिवरायांचे मावळे जाती-धर्मासाठी नव्हे, तर स्वराज्यासाठी लढले. ते कधी थकले नाहीत, ना कधी वेतनासाठी लढले,” असे ठामपणे सांगितले. तसेच, “ज्या ठिकाणी औरंगजेबची कबर आहे, त्या औरंगाबादचे नामकरण आम्ही छत्रपती संभाजीनगर केले. औरंगजेब आमचा पूर्वज असू शकत नाही,” असेही त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे शिवप्रेमींमध्ये नवा उत्साह संचारला असून, आग्रामधील स्मारकाबाबत आता महाराष्ट्र सरकारच्या पुढील पावलांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *