नवी दिल्ली : देशातील आघाडीची माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस् (टीसीएस) ने जाहीर केलेली १२,५०० कर्मचाऱ्यांची नोकरकपात ही केवळ सुरुवात असून, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) भविष्यात इतरही आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात होण्याची शक्यता आहे, असा इशारा जाणकारांनी दिला आहे. या कपातीचा सर्वाधिक फटका मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांना बसणार आहे.
एआयमुळे कमी खर्चात अधिक काम
आयटी कंपन्या एआयचा वापर करून कमी खर्चात जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे भविष्यात आणखी नोकरकपात होण्याची शक्यता आहे. एआय एजंट्स सध्या मानवी एजंटची जागा अत्यंत वेगाने घेत आहेत. बदलत्या ग्राहकांच्या प्राधान्यांमुळे आणि ऑटोमेशनच्या वाढत्या वापरामुळे टीसीएसमध्ये कर्मचारी कपात होत आहे. इतर कंपन्याही एआय आणि स्वयंचलितिकरण स्वीकारत असल्याने, नजीकच्या भविष्यात अशाच मोठ्या कर्मचारी कपातीची शक्यता आहे.
कोणत्या कंपन्यांमध्ये किती कर्मचारी कमी होणार?
विविध कंपन्यांमध्ये होणारी संभाव्य कर्मचारी कपात खालीलप्रमाणे दर्शविली आहे
* टीसीएस: १२,५००
* इंटेल: १०,०००
* पॅनसोनीक: १०,०००
* मायक्रोसॉफ्ट: १०,०००
* आयबीएम: ३,९००
* मेटा: ३,०००
ही कर्मचारी कपात कंपन्यांच्या ‘भविष्यासाठी तयार करण्याच्या रणनीती’चा एक भाग असल्याचे म्हटले जात आहे, ज्यामुळे तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा थेट परिणाम रोजगार निर्मितीवर होताना दिसत आहे.
Leave a Reply