“लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय” सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या वक्तव्याने वाद

“लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय,” असे विधान सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केल्याने राजकीय वर्तुळात आणि शेतकरी संघटनांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील घोडगाव येथे खासगी बँकेच्या कार्यक्रमात बोलताना मंत्री पाटील म्हणाले, “लोकांना वाटते की कर्जमाफी मिळेल, त्यामुळे अनेक जण घेतलेले कर्ज फेडत नाहीत. हा नाद लागला आहे.” तसेच त्यांनी पुढे म्हटले की, “आम्हाला निवडून द्यायचं असतं, त्यामुळे निवडणुकीच्या काळात आम्ही कधी कधी आश्वासन देतो. पण प्रत्येक मागणी पूर्ण होऊ शकत नाही.”

या विधानानंतर विरोधी पक्ष आणि शेतकरी संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. विरोधकांनी पाटील यांच्यावर “शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा” आरोप केला आहे. भाजप, काँग्रेस तसेच शिवसेनेच्या नेत्यांनी हे वक्तव्य “असंवेदनशील” असल्याचे म्हटले आहे. काही संघटनांनी तर पाटील यांची माफी मागण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, वाद वाढल्यानंतर मंत्री पाटील यांनी स्पष्टीकरण देत म्हटले की, “माझा हेतू शेतकऱ्यांचा अपमान करण्याचा नव्हता. मी केवळ ग्रामीण अर्थव्यवस्थेतील समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.” त्यांनी जर कोणाची भावना दुखावली असेल तर ती खंत व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टी, पुर आणि पिकांच्या नुकसानीमुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा वेळी हे विधान आल्याने असंतोष अधिक वाढला आहे. शेतकरी संघटनांनी पुन्हा एकदा संपूर्ण कर्जमाफीची मागणी पुढे आणली आहे.या प्रकरणावर पुढील काही दिवसात राज्य सरकारची भूमिका आणि राजकीय परिणाम काय होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *