मुंबई – बदलापूर येथे लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखालील आरोपी अक्षय शिंदेच्या पोलिस चकमकीत झालेल्या मृत्यूबाबत न्यायालयीन चौकशी समितीने पोलिसांना निर्दोष ठरवले आहे. माजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने सादर केलेला अहवाल राज्य सरकारने स्वीकारला आहे.
आयोगाच्या निष्कर्षानुसार, पोलिसांनी आत्मरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा मान्य करण्यात आला आहे. मात्र, आरोपीच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविताना पोलिसांच्या कार्यपद्धतीत काही त्रुटी असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. आयोगाने अशा घटनांसाठी मानक कार्यपद्धती (SOP) तयार करण्याची आणि आरोपींच्या ताबा हस्तांतरणासाठी GPS यंत्रणा बसवण्याची शिफारस केली आहे.
अक्षय शिंदे हा सफाई कामगार म्हणून काम करत होता. त्याच्यावर दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे आरोप होते. ऑगस्ट 2024 मध्ये त्याला अटक करून तुरुंगात टाकण्यात आले होते. 23 सप्टेंबर रोजी पोलिसांनी त्याला दुसऱ्या प्रकरणासाठी ताब्यात घेतले असताना मुंब्रा बायपासजवळ ही घटना घडली. पोलिसांच्या मते, शिंदेने पोलीस अधिकारी निलेश मोरे यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरवर ताबा मिळवून गोळीबार केला, ज्यात मोरे जखमी झाले. त्यानंतर पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी आत्मरक्षणार्थ गोळीबार करून अक्षयचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, राज्य मानवाधिकार आयोगानेही या घटनेत कोणताही गैरव्यवहार आढळला नसल्याचे स्पष्ट केले आहे. अक्षयच्या पालकांनी सुरुवातीला न्यायालयात याचिका दाखल केली होती, परंतु नंतर ती मागे घेतली. उच्च न्यायालयाने याप्रकरणी विशेष तपास पथक (SIT) नेमण्याचे निर्देश दिले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने नंतर आदेशात बदल करून SIT ची स्थापना महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांच्या देखरेखीखाली करण्यास सांगितले. या अहवालानंतर पोलिसांना या प्रकरणातून संपूर्ण दिलासा मिळाला आहे.
Leave a Reply