अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवासाठी ३१ मे रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत. राज्याचे विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे त्यांची भेट घेऊन त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. नगरच्या शासकीय विश्रामगृहावर सभापती राम शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळ सदस्यांनी अहिल्यादेवींना अभिवादन केले आहे व तीर्थक्षेत्र विकास प्रकल्पांतर्गत राज्यातील प्रमुख तीर्थस्थळांच्या विकासासाठी पाच हजार कोटींचा निधी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याअंतर्गत चौंडीच्या विकासासाठी 681 कोटींचा निधी मिळणार आहे. त्याचा शासन निर्णय येत्या सोमवारी वा मंगळवारी जाहीर होईल. चौंडी गाव हे राष्ट्रीय स्मारक करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला असून, त्यादृष्टीने वाटचाल सुरू झाली आहे व त्याचाच भाग म्हणून चौंडी विकासाला निधी मिळणार आहे, असेही प्रा. शिंदे यांनी स्पष्ट केले.
दरवष चौंडीत 31 मे रोजी पुण्यलोक अहिल्यादेवी होळकरांचा जयंती महोत्सव होतो. पण यंदाचा जयंती महोत्सव तीनशेवा असल्याने तसेच राष्ट्रपतींसह राज्यपाल सी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्य व वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमास येणार असल्याने तेथील आवश्यक सुविधा व प्रशासकीय तयारीबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलिस अधीक्षकांसमवेत आढावा बैठक घेतली आहे. यंदाच्या जयंती महोत्सवासाठी राज्यभरातून व देशभरातून लाखो नागरिक चौंडीला येणार असल्याने त्या गदच्या दृष्टीनेही तसेच सध्याचे पावसाळ्याचे वातावरण पाहता त्या अनुषंगानेही नियोजनाच्या सूचना दिल्याचे प्रा. शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, 31 मे रोजीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने चौंडीत मंडप, स्टेज, ग्रीन रुम, आसन व्यवस्था, प्रसाधनगृह, सीसीटीव्ही, अग्निशमन यंत्रणा, ध्वनीक्षेपक व विद्युतीकरण, वातानुकूलिन कक्ष, सुरक्षा बॅरिकेडींग आदी सुविधांची कामे सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.
Leave a Reply