एसएससी परीक्षा २०२५ : विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वाहतूक व्यवस्थेत विशेष उपाययोजना

मुंबई महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत असल्याने, विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांपर्यंत वेळेवर पोहोचता यावे यासाठी विविध वाहतूक यंत्रणांनी विशेष नियोजन केले आहे.
बेस्ट प्रशासनाने परीक्षा काळात विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यासाठी वाहक, चालक आणि निरीक्षकांना विशेष निर्देश दिले आहेत. बेस्टचे जनसंपर्क अधिकारी सुदास सावंत यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांना वेळेवर पोहोचता यावे यासाठी शक्य तिथे बससेवा वळवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना पुढच्या दाराने चढण्याची आणि उतरण्याची मुभा देण्यात आली आहे.” परीक्षा केंद्रांच्या जवळ जास्तीत जास्त थांबे उपलब्ध करून देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
वाहतूक पोलिसांकडून देखील परीक्षेच्या काळात वाहतूक सुरळीत ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त (वाहतूक) एम. रामकुमार यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या वाहतूक कोंडीचा फटका बसू नये म्हणून वाहतूक व्यवस्थापनावर विशेष लक्ष दिले जाणार आहे.”
रेल्वे प्रशासनाने देखील परीक्षेच्या अनुषंगाने काही महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले की, “रेल्वेगाड्या १०० टक्क्यांहून अधिक क्षमतेने धावत असून, अतिरिक्त गाड्या जोडणे शक्य नसले तरी वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जाईल.”
मध्य रेल्वेनेही परीक्षा काळात विलंब टाळण्यासाठी नियंत्रण कक्षात अतिरिक्त कर्मचारी तैनात केले आहेत. मध्य रेल्वेचे सीपीआरओ डॉ. स्वप्नील निला यांनी सांगितले की, “गर्दीच्या वेळी आणि परीक्षेच्या वेळेत कोणतीही असुविधा होऊ नये यासाठी रेल्वे व्यवस्थापन सज्ज आहे.”
या विशेष उपाययोजनांमुळे एसएससी परीक्षार्थींना प्रवास अधिक सोयीस्कर होणार असून, त्यांना वेळेवर परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यास मदत होईल.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *