तिरुवनंतपुरम : केरळच्या राजधानीतील तिरुवनंतपुरम महापालिकेच्या २०२५ मधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) मोठा विजय मिळवत १०१ पैकी ५० प्रभाग जिंकले आहेत. या निकालामुळे सत्ताधारी डाव्या लोकशाही आघाडी (एलडीएफ) आणि काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडीला (युडिएफ) मोठा धक्का बसला आहे. केरळ राज्य निवडणूक आयोगाने (एसईसी) ही अधिकृत आकडेवारी जाहीर केली.
पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानात ७०.९१ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. अंतिम निकालानुसार एलडीएफने २९, युडिएफने १९ प्रभाग जिंकले, तर २ प्रभाग अपक्ष उमेदवारांकडे गेले. २०२० च्या महापालिका निवडणुकीत एलडीएफने ५२, भाजपप्रणीत एनडीएने ३३ आणि युडिएफने १० प्रभाग जिंकले होते. यावेळी एनडीएने केलेली झेप राजधानीतील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाचा बदल दर्शवते.
दरम्यान, स्वतंत्र उमेदवाराच्या निधनामुळे विजिंजम परिसरातील मतदान पुढे ढकलण्यात आले होते. तरीही एकूण निकालांवर त्याचा फारसा परिणाम झाला नाही.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते खासदार शशी थरूर यांनी प्रतिक्रिया देताना भाजपच्या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक केले. “तिरुवनंतपुरम महापालिकेत भाजपने मिळवलेला विजय हा राजधानीच्या राजकीय पटावर लक्षणीय बदल दर्शवतो. ४५ वर्षांच्या एलडीएफच्या सत्तेविरोधात बदलासाठी मी प्रचार केला होता. मात्र मतदारांनी परिवर्तनाचा संदेश देत दुसऱ्या पक्षाला संधी दिली. हीच लोकशाहीची खरी ताकद आहे. जनतेचा कौल कोणाच्याही बाजूने असो, तो स्वीकारलाच पाहिजे,” असे थरूर म्हणाले. या निकालामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने केरळच्या राजकारणात नव्या घडामोडींचे संकेत मिळत आहेत.


Leave a Reply