जमशेदपूर : टाटा समूहाच्या मुख्य नियंत्रण यंत्रणा असलेल्या टाटा ट्रस्ट्सने वेणु श्रीनिवासन यांची पुन्हा एकदा आजीवन ट्रस्टी म्हणून सर्वानुमते नियुक्ती केली आहे. त्यांचा कार्यकाळ 23 ऑक्टोबर रोजी संपत असताना हा निर्णय घेण्यात आला असून, संस्थेतील गटबाजी थोपवण्याचा प्रयत्न म्हणून या हालचालीकडे पाहिले जात आहे.
टाटा ट्रस्ट्स सध्या दोन गटांमध्ये विभागले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एका बाजूला रतन टाटांच्या निधनानंतर नेतृत्व सांभाळणारे नोएल टाटा असून, दुसऱ्या बाजूला शापूरजी पालोनजी गटाशी संबंधित मेहरी मिस्त्री यांचा प्रभाव आहे. या पार्श्वभूमीवर श्रीनिवासन यांच्या पुनर्नियुक्तीला ट्रस्टमध्ये स्थैर्य आणि ऐक्याचा संदेश देणारी चाल म्हणून महत्त्व प्राप्त झाले आहे.
आता सर्वांचे लक्ष मेहरी मिस्त्री यांच्या कार्यकाळाकडे वळले आहे, जो 28 ऑक्टोबरला संपत आहे. त्यांची आजीवन पुनर्नियुक्ती होणार का, यावर सध्या चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यासाठी सर्व ट्रस्टींची सर्वानुमते मंजुरी आवश्यक आहे. मात्र काहींच्या मते, त्यांच्या कार्यकाळाचे आपोआप विस्ताराचे नियम लागू होतील का, यावर मतभेद आहेत.
गेल्या वर्षी 17 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या बैठकीत ठराव मंजूर झाला होता की, कोणत्याही ट्रस्टीचा कार्यकाळ संपल्यानंतर त्याला पुन्हा मर्यादाविना नियुक्त करता येईल. विरोध करणाऱ्या ट्रस्टींना ट्रस्टमध्ये सेवेसाठी अयोग्य मानले जाईल, असेही ठरवण्यात आले होते.
टाटा ट्रस्ट्सकडे टाटा सन्समधील तब्बल 66 टक्के हिस्सेदारी आहे, ज्यामुळे या निर्णयांचे टाटा समूहातील सर्व कंपन्यांवर दूरगामी परिणाम होऊ शकतात. श्रीनिवासन यांच्या पुनर्नियुक्तीमुळे ट्रस्टमध्ये परंपरा, स्थैर्य आणि एकतेचा पुनरुच्चार झाला असला तरी मिस्त्रींच्या पुनर्नियुक्तीवरून पुढील दिशा निश्चित होणार आहे.


Leave a Reply