काशी आता केवळ आध्यात्मिक नव्हे, तर आर्थिक प्रगतीचेही केंद्र – पंतप्रधान मोदींचा विश्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (११ एप्रिल २०२५) आपल्या लोकसभा मतदारसंघातील ५० व्या भेटीदरम्यान वाराणसीत ३,८८० कोटी रुपयांहून अधिक निधीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन केले. पंतप्रधानपदी आल्यापासून वाराणसीतील झालेल्या बदलांचा उल्लेख करताना मोदी यांनी सांगितले की, काशीने (वाराणसी) आपला पुरातन वारसा जपत आधुनिकतेची दिशा स्वीकारली आहे. “गेल्या दशकात काशीत लक्षणीय बदल घडून आले आहेत. इथे आध्यात्मिक परंपरेसोबत आधुनिक दृष्टिकोनाचा संगम झाला आहे. आज काशी ही केवळ ऐतिहासिक शहर न राहता, पूर्वांचलाच्या आर्थिक नकाशावर एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास आली आहे,” असे मोदी म्हणाले.

मेहंदीगंज येथे झालेल्या सार्वजनिक सभेत बोलताना मोदी यांनी १३० पिण्याच्या पाण्याच्या योजना, १०० नवीन अंगणवाडी केंद्रे, ३५६ ग्रामीण ग्रंथालये, पिंड्रा येथील एक नवीन पॉलिटेक्निक कॉलेज आणि सरकारी पदवी महाविद्यालय यासह विविध ग्रामीण प्रकल्पांची माहिती दिली.

“या उपक्रमांमुळे पूर्वांचलचा चेहरामोहरा बदलणार आहे. गावोगावी पायाभूत सुविधा पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे. हे प्रकल्प या संकल्पाच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा आहेत,” असे ते म्हणाले.

कनेक्टिव्हिटी वाढवणे, शुद्ध पाण्याचा पुरवठा, शैक्षणिक व आरोग्य सुविधा विस्तार, क्रीडा क्षेत्रात भक्कम पायाभरणी, तसेच युवकांसाठी अधिक संधी निर्माण करणे या सर्व बाबींसाठी विविध प्रकल्पांचा शुभारंभ झाला असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. “काशी आणि पूर्वांचलसाठी या प्रकल्पांचे महत्त्व फार मोठे आहे. हे संपूर्ण भाग विकसित क्षेत्रात रूपांतरित होण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल आहे,” असे ते म्हणाले.

काशीला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र मानले जाते. मात्र, आता तीच काशी आर्थिक प्रगतीचे नेतृत्व करत असल्याचे मोदी यांनी ठासून सांगितले.

“काशीची प्राचीन आत्मा आणि आधुनिक ओळख यांचं समन्वय साधणं ही आपली जबाबदारी आहे. आज ती केवळ आध्यात्मिक नगरी नाही, तर संपूर्ण प्रदेशाच्या विकासाचे प्रमुख केंद्र बनली आहे,” असे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमात मोदी यांनी ७० वर्षांवरील वृद्धांसाठी ‘आयुष्मान वय वंदना’ आरोग्य कार्डांचे वाटप केले.

“ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच आमच्या योजनेचे खरे यश आहे. आता त्यांना वैद्यकीय खर्चासाठी कर्ज काढण्याची किंवा जमिन विकण्याची गरज भासणार नाही. सरकार त्यांच्या पाठीशी उभी आहे,” असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी बनास डेअरीशी संलग्न असलेल्या पशुपालकांना १०६ कोटी रुपयांचा बोनस वितरित केला. “या प्रदेशातील हजारो कुटुंबांचे आर्थिक जीवनमान सुधारण्यात आणि विशेषतः महिलांना सक्षम करण्यात या डेअरीने मोठी भूमिका बजावली आहे,” असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघात ही भेट केवळ विकास कामांचे उद्घाटन नव्हते, तर काशीच्या बदलत्या ओळखीचा, तिच्या आध्यात्मिकतेपासून आधुनिकतेपर्यंतच्या प्रवासाचा साक्षीदार ठरलेला एक ऐतिहासिक क्षण होता.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *