शरद बुट्टेपाटील लिखित ‘संवेदना अंतर्मनाची’ या पुस्तकाचा रविवारी प्रकाशन सोहळा पार पडला. त्यांच्या संवेदना अंतर्मनाची या पुस्तकाला संपादक तथा महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संचालक महेश म्हात्रे यांनी लिहलेली प्रस्तावना खालीलप्रमाणे.
वेदनेचे वेद … अनुभवाची गाथा
– महेश म्हात्रे
माणसाचे जीवन म्हणजे काय तर जगताना, जगणं पाहताना आलेल्या बर्यावाईट अनुभवांचा एक गुच्छ. जाणता माणूस त्या गुच्छातील सुकलेली, गंध हरवलेली फुले सहजपणे बाजुला काढुन टवटवीत आणि सुगंधित फुलांवर खुष असतो. त्याला “जीवन सुंदर आहे” असं वाटणं स्वाभाविक आहे. पण अज्ञानी , समज नसलेले लोक सुकलेली, सडलेली फुले हातातून सोडायला तयार नसतात. परिणामी त्यांच्या भोवतालचे वातावरण दुर्गंधी, दु:खी होत जाते… संत तुकाराम महाराज या सगळ्या मनोव्यापाराकडे फार गांभीर्यपूर्वक पहात लिहितात, ” ज्याचे जया ध्यान | तेचि होय त्याचे मन “, म्हणजे, जो ज्या विषयावर, गोष्टींवर ध्यान किंवा लक्ष केंद्रित करतो, तो तसाच होतो, त्याचे मन त्याच आवडीच्या, बर्या किंवा वाईट विषयात समरसून जाते. एकूणच काय तर आपल्या आयुष्याची दिशा ठरवणे आपल्याच हातात असते. यासंदर्भात तुकाराम महाराज थेट सांगतात की,
” आपणचि तारी आपणचि मारी |
आपण उध्दरी आपणयां | ( तु. गा. २०४२ ) याचा अर्थ सरळसोपा आहे, आपणच आपल्याला तारतो किंवा मारतो. आपण ठरवलं तर स्वत: चा उद्धार करून , जगण्यात सौंदर्य, आनंद आणि समाधान भरु शकतो… जीवन सुंदर आहे याचा अनुभव घेऊ शकतो. शरद बुट्टेपाटील यांच्या या अनुभवसंपन्न लेखसंग्रहात हिच दिशादर्शक मांडणी वाचकाला नवे आत्मभान देते. आपल्या राजकीय वाटचालीसह, धार्मिक आणि सामाजिक कार्यात सतत मग्न असणारे शरदभाऊ या लेखसंग्रहात विविध विषयांवर प्रखर प्रकाशझोत टाकतात.
आज, जेव्हा जगात कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग अशा नवनवीन यंत्राधारित तंत्रज्ञानाच्या प्रगतीने आपल्या आसपासची परिस्थिती मुळापासून बदलण्याची सुरुवात केली आहे. आजपासून दहा वर्षांनी आपले जगणे किती बदलेल, याचा भल्या भल्या विचारवंतांना देखील अंदाज येत नाही. त्या संक्रमण काळात एका राजकीय क्षेत्रातील जाणकारांच्या “अंतर्मनातील संवेदना” समाजासमोर पुस्तक रूपाने जाणे हे मला महत्वाचे वाटते या पुस्तकातील बहुतांश लेख शरदभाऊंनी याआधी फेसबुकवर प्रसिद्ध केले आहेत. ते बहुतेक लेख मी फेसबुकवरच वाचलेले आहेत. जगात सगळीकडे लोक सोशल मीडियाला नवे ठेवत असताना, एक सामाजिक कार्यकर्ता त्याचा सकारात्मक पद्धतीने वापर करतो, त्या पोस्ट वर लोक आपल्या प्रतिक्रिया देतात आणि त्याचे पुस्तक होऊन ते नव्या रूपात लोकांच्या हाती पडणे , ही घटना आपल्या उज्वल भविष्याच्या आशा पल्लवित करते. आणि म्हणून एक लहान खेडे ते उद्योग धंद्यांनी गजबजलेले शहर असा चाकणचा प्रवास शब्दबद्ध करणारे हे पुस्तक मला सामाजिक दस्तऐवज म्हणून महत्त्वाचे वाटते .
आपण सर्व जाणतोच की, प्रत्येक माणसामध्ये अफाट सामर्थ्य दडलेले असते, पण लोक या सामर्थ्यांचा वापरच करीत नाहीत. आपण सर्वानी हे सामर्थ्य वापरले तर अवघा समाज सुखी-समाधानी होईल’, असा आशावादी आग्रह हेन्री डेव्हिड थोरो या अमेरिकन विचारवंताने सातत्याने मांडला. एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेल्या थोरो यांच्या या निसर्गवादी विचारांचा प्रभाव विसाव्या आणि एकविसाव्या शतकावरही पडलाय. आपल्याकडील संतांच्या, ऋषीमुनींच्या जीवनशैलीशी जुळणार्या पैसा, ऐषौआराम टाळून साध्या जगण्याचा थोरो पुरस्कार करीत. भारताच्या बाबतीत सांगायचे तर महात्मा गांधी यांना थोरो लिखित ‘वाल्डेन’ ग्रंथाने खूपच प्रभावित केले होते. निसर्गाशी समरस होत, शारीरिक श्रम आणि संयमी जीवन जगण्याची अवघ्या जगाला प्रेरणा देणा-या थोरो यांनी गांधीजींच्या शांततापूर्ण आणि अहिंसावादी क्रांतिकल्पनेला वैचारिक बैठक दिली होती. गांधीवादाने फक्त भारतालाच स्वातंत्र्य मिळवून दिले असे नाही, तर दक्षिण आफ्रिकेपासून म्यानमापर्यंतच्या सर्वंकष समाजक्रांतीला गांधी तत्त्वज्ञानाची प्रेरणा लाभली, आजही लाभतेय. फक्त ज्या देशात हे मानवी सहजीवनाची सुख स्वप्न पाहणारे तत्त्वज्ञान जन्माला आले तेथे मात्र त्याची पदोपदी पायमल्ली होताना दिसते आणि दुसरीकडे या भारतीय भूमीतील सगळ्याच ‘सुशिक्षितांचे’ डोळे आकाशवेधी शेअरबाजारावर किंवा भौतिक प्रगतीच्या आलेखावर खिळलेले असल्यामुळे, आपल्या पायाखाली काय जळतेय याकडे कुणाचेच लक्ष नाही…
काय सुरू आहे आमच्या समाजात, असा जर आपल्याला प्रश्न पडला तर आपण समाजाचे प्रतिबिंब जेथे पडते, त्या माध्यम विश्वात काय सुरु आहे ते पहातो.
कोणतेही वृत्तपत्र उघडा. वृत्तवाहिनी सुरु करा. काय येतं आपल्या डोळ्यासमोर, तर एकीकडे महिलांवरील अत्याचाराच्या, घातपात, अपघात, भ्रष्टाचार, राजकीय खडाजंगीच्या भयंकर बातम्या असतील तर दुसरीकडे त्याला पूरक पडसाद उमटताना दिसत असतात. ज्या लोकांनी समाजात चांगले वातावरण निर्माण करणे अपेक्षित आहे, ज्यांंच्यावर समाजाला वळण लावणे अपेक्षित असते, ते मान्यवर नेतृत्व उर्मट वक्तव्यांनी एकमेकांवर शाब्दिक हल्ला करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत… मग मनात सहज प्रश्न येतो, सर्वसामान्य नागरिकांच्या मनात या अशा बातम्या वाचताना संतापाचा लाव्हा कसा उसळून येत असेल… अर्थात त्याची दाहकता लोक रस्त्यावर यायला लागल्यानंतर आपण पाहिली आहे. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आजवर झालेली विविध आंदोलने आपण पाहिली, पण दुर्दैव असे की, त्यामुळे एकाही राजकीय पक्षाला समाजभान आलेले दिसत नाही. आपल्याकडील नेतृत्व करणारे लोक आणि राजकीय पक्ष जनतेचे प्रश्न न जाणवण्याएवढे संवेदनाहीन, गेंडय़ाच्या कातडीचे झाले असतील का?
रस्त्यांवरील, रेल्वेमार्गातील आणि नदी-नाल्यांमधील अपघात हे असेच आपल्याकडील बातम्यांचे विषय. तुम्ही तुम्हालाच कधी प्रश्न विचारून पहा, प्रगत देशांच्या तुलनेत आपल्या देशात किती सहजपणे अक्षरश: किडया-मुंग्यांसारखी माणसे मरतात. ब-याचदा स्वत:ची कोणतीही चूक नसताना, छोटी सावधगिरी न बाळगल्यामुळे एकावेळी पाच-पन्नास माणसे सहजपणे मरतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मुंबईत फक्त
रेल्वेमार्ग ओलांडून जाताना जवळपास अठरा, एकोणीस लोक दररोज मरतात. सेल्फी काढताना किंवा कारचे सीटबेल्ट नलावल्यामुळे जीव गमावून बसणाऱ्यांची संख्या आपल्याच देशात जास्त आहे. मध्यंतरी आंध्र प्रदेशातून हिमाचल प्रदेशात सहलीला गेलेल्या इंजिनीयरिंगच्या २५ विद्यार्थ्यांचा धरणाचे पाणी अचानक सोडल्यामुळे झालेला भीषण मृत्यू असाच मन हादरविणारा होता. केवळ निष्काळजीपणा हे त्या अपघाता मागील कारण होते. तारुण्याच्या उंबरठयावर असणा-या त्या २५ विद्यार्थ्यांच्या घरात त्या बातमीने उडालेला दु:खाचा उद्रेक प्रत्येक संवेदनशील मनाला चटका देणारा होता. मी आजही ती घटना विसरू शकत नाही. मात्र, आमच्या बथ्थड डोक्याच्या सरकारी यंत्रणेला मात्र त्यामुळे काहीच दु:ख होत नाही का, की लोकांचे हे असे हकनाक मरणे आमच्या शासनव्यवस्थेने आणि जनतेने गृहीत धरले असावे…
माणसाच्या जगण्याला आपल्याकडे किंमत उरलेली नाही, मग त्याचे मरणेही सुसह्य व्हावे याचा विचार करायला कुणाला वेळ असेल? प्रत्येक माणसात ‘देव’ पाहण्याची भाषा आम्ही खूप करतो, पण जेव्हा कृतीची वेळ येते त्या वेळी त्या ‘देवाला’ किंवा ‘देवीला’ रस्त्यावर फेकण्यास मागेपुढे पाहिले जात नाही. स्त्रीभ्रूण हत्या किंवा नवजात बाळ उकीरडय़ावर फेकणे या गोष्टी आपल्या देशात तशा ‘कॉमन’ मानल्या जातात, पण रुग्णालयातील आजारी माणसे रस्त्यावर फेकण्याची नवी ‘ पद्धतही’ आपल्या राज्यात सुरू झाली आहे. कधी माध्यमातून या विषयावर बातमी आली तर एक- दोघांवर कारवाई होते. पण तो काही या बदलत्या मानसिकतेवर उपाय होत नाही. रुग्णालयातील गरीबांना सेवा नाकारणा-यांना अटक करून आमच्या किडलेल्या समाजमनाला, बिघडलेल्या शासनयंत्रणेला सुधारता येणार नाही. त्यासाठी आमच्या सामुहिक मनाचा, या समाजासमोरील प्रत्येक प्रश्नाचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार होणे गरजेचे आहे, पण तसा अभ्यास करण्याची, एखाद्या विषयाच्या मुळाशी जाण्याची पद्धतच स्वातंत्र्यानंतर आमच्या समाजात विकसित झालेली दिसत नाही, हे सगळ्यात मोठे दुर्दैव. आपल्याकडील विद्यापीठे, वृत्तपत्रे, विविध अकादम्या या आणि अशा इतर विचार-वर्तनाचे विश्लेषण करणा-या संस्थाही समाजाचाच भाग असल्यामुळे तेथील वैचारिक प्रगती कधीच सखोल झाली नाही. परिणामी समाजाच्या पृष्ठभागावर दिसणा-या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक बदलांना, तवंगांना प्रगतीचे तरंग मानण्याची पद्धत रूढ झाली. स्वातंत्र्यानंतर ज्या संस्थांकडून समाजमनाचा तळ गाठून तेथील बदलांचा अभ्यास केला जाईल अशी आशा होती, त्या संस्था एकतंत्री कारभार, एकांगी विचारसरणी आणि एकांडय़ा कार्यपद्धतीमुळे लोकांपासून तुटल्या. वाईची प्रज्ञा पाठशाळा, पुण्याची यशदा, आंबेडकर प्रबोधिनी, गोखले अर्थशास्त्र संस्था, भांडारकर इन्स्टिटयूट आदी समाजप्रबोधनाची क्षमता असणा-या संस्था ‘ठरावीक लोकांनी, खास लोकांसाठी चालविलेल्या संस्था’ कधी बनून गेल्या हे ना त्या संस्था चालवणा-यांना कळले, ना महाराष्ट्राला त्याची कधी जाणीव झाली. ज्याप्रमाणे कृषी विद्यापीठामध्ये चालणारे संशोधन फार क्वचितच शेतक-याच्या शेतात पोहोचते, तद्वत या मान्यवर संस्थांमध्ये होणारी वैचारिक घुसळण सामान्य माणसांच्या परिघाबाहेरच राहते. हे कुठे तरी थांबले पाहिजे. तसेच नवीन तंत्रज्ञान, जीवनपद्धती आणि नवविचारांचा वेध घेणा-या संशोधन संस्था नव्याने निर्माण होणे गरजेचे आहे. पण तसे होत नसल्यामुळे आमच्याकडील ‘केजी टू पिजी’ अशी खालपासून वरपर्यंतची शिक्षणव्यवस्था खरंच जीवन जगण्यास उपयोगी आहे की नाही, यावर साधी चर्चाही कुणी करताना दिसत नाही. मग त्यात बदल सुचविणे फार पुढची गोष्ट. आजही आपल्याकडे दहावी आणि बारावीच्या परीक्षांना आलेल्या अफाट महत्त्वावर कुणी शिक्षणतज्ज्ञ तोंड उघडायला तयार नाही. इंग्रजी माध्यम हा यशाचा राजमार्ग नाही. आपल्या मातृभाषेत शिक्षण घेऊन तुम्ही अफाट यश मिळवू शकता, असे सांगणारा एकही जाणकार माणूस अवती-भवती दिसत नाही. परिणामी पुढील पिढीच्या चांगल्या आयुष्याची, खरे सांगायचे तर इंग्लंड-अमेरिकेतील ऐषारामाची स्वप्ने पाहणारे पालक आपल्या मुला-मुलींना ‘रॅट रेस’मध्ये ढकलतात. अगदी ज्युनियर के. जी. च्या वर्गात प्रवेश मिळवण्यापासून शाळेच्या एकाहून एक किमती मागण्या पूर्ण करण्यासाठी हे पालक ऊर फुटेस्तोवर धावतात. मुलांचे कपडे, फी, शिकवण्या, मोबाइल, टॅबसारख्या महागडया हौशी पुरवताना या पालकांची अक्षरश: दमछाक होत असते. पण तरीही त्यांच्या या वर्तनातील गुणदोषांची चिकित्सा करण्यासाठी एकही शिक्षणतज्ज्ञाला पुढे यावेसे वाटत नाही, कारण आमच्या समाजातील ‘विचारवंतां’चे रूपांतर परोपजीवी, दुस-यांचे शोषण करणा-या ‘विकारजंता’मध्ये झाले आहे. तत्कालिक फायदा मिळतो म्हणून आज पालकांच्या आयुष्यभराच्या पुंजीवर डल्ला मारणा-या या सुशिक्षितांच्या बुभुक्षित नजरा आता पालकांना लुबाडण्याचे नवनवे स्वप्नमार्ग शोधत आहेत. त्यापासून सावध राहिले पाहिजे. कारण या यशाचे दावे करणा-या शिक्षणतज्ज्ञांच्या मुखवटयाआड एक विकारी सौदेबाज दडलेला असतो. आपल्या फायद्यापलीकडे त्याला दुसरे काहीच दिसत नसते. मी किंवा शरदभाऊ सारखे अनेक जण जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिकल्यामुळे, आम्ही या शैक्षणिक विषयावर किंवा एकूणच ज्ञान संपादन करण्याच्या पद्धतीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो.
तसे पाहिले तर तांत्रिकदृष्टया झालेली प्रगती गाठून आज आपण आधुनिक तंत्रयुुगात प्रवेश केला आहे. ज्ञानाधिष्ठित जीवनमूल्ये मानणारे आधुनिक तंत्रज्ञान मनाच्या वेगाने जगाच्या कानाकोप-यात पसरत आहे. हे तंत्रज्ञान जिथे जन्मले त्या युरोप-अमेरिकेसारख्या मानवी मूल्यांचा आदर करणा-या देशात त्याचा उपयोगही जगणे सोपे करण्यासाठी झाला. तिकडे लागणा-या सर्व आधुनिक शोधांमध्ये समग्र मनुष्यमात्राचा विकास ही संकल्पना मुख्य असते. परिणामी त्या वैज्ञानिक शोधातून विकसित झालेले तंत्र सामान्य माणसाच्या हातात सोपे करून देण्याकडे तेथील शास्त्रज्ञ आणि संशोधक आवर्जून लक्ष देतात. त्याउलट आपल्याकडील कोणत्याही विषयातील तज्ज्ञ मंडळी घ्या (अर्थात त्याला माजी राष्ट्रपती कलामसाहेब किंवा प्रसिद्ध संशोधक माशेलकर साहेबांसारखे अनेक सन्माननीय अपवाद आहेत.) आधी ते आपले संशोधन किंवा वैचारिक विवेचन सामान्य माणसाला कळणारच नाही, या मतावर ठाम असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची कोणी चिकित्सा केलेली त्यांना आवडत नाही आणि त्याहून दुर्दैवाची बाब म्हणजे, आपण ज्या क्षेत्रात मेहनत करून ज्ञान प्राप्त केले, त्याचा उपयोग सर्वसामान्य माणसाचे जगणे सुलभ होण्यासाठी व्हावा, अशी फार कमी लोकांची अपेक्षा असते. हे वास्तव मन अस्वस्थ करणारे आहे.
१९ व्या शतकात आपला देश भलेही पारतंत्र्यात होता. साक्षरतेचे प्रमाण हाताच्या बोटावर मोजता येण्याएवढे अत्यल्प होते. अफाट गरिबी होती, अंधश्रद्धांच्या मगरमिठीत अवघा समाज सापडलेला होता. या साऱ्या नकारात्मक वातावरणातही त्या काळातील लोकांमध्ये जे विचारमंथन होत होते, त्याचा समाजाला उपयोग होत होता. आजच्याप्रमाणे त्या काळातील विद्यापीठे ‘पदव्यांचे कारखाने’ बनले नव्हते, त्यामुळे विद्यापीठात ज्ञानसाधना होत होती. त्या काळातील विद्यापीठांमध्ये बहुतांश प्राध्यापक इंग्लंड-युरोपातून येत असत. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा राखण्यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला मुक्त वाव मिळे. आज देशातील जास्तीत जास्त दहा टक्के महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तसे वातावरण उपलब्ध आहे. उर्वरित ठिकाणी आनंदी आनंद. सारे प्राध्यापक आपापल्या अभ्यासक्रमात इतके गढलेले की त्यांना त्या पलीकडील जगाची फिकीर उरलेली नाही, त्यामुळे मर्यादित ज्ञानात भरपूर गुण मिळविण्याच्या ‘यशस्वी फॉर्म्युल्यां’ची ‘मास्टर की’ ही अध्यापन क्षेत्रातील मंडळींची ‘मास्तरकी’ बनलेली दिसते. मग अशा शाळेतून, महाविद्यालयांतून बाहेर पडणारी मुले-मुली प्रगल्भ सामाजिक जाणिवा घेऊन समाजात जातील अशी अपेक्षा कशी करावी?
आम्ही ज्या पाश्चात्य देशांतील आधुनिक तंत्रज्ञान, स्वकेंद्रित जीवनशैली आणि वैश्विक अर्थज्ञान आज मिळवलेले आहे, ते मिळवताना फक्त ‘कॉपी-पेस्ट’चेच कष्ट आम्हाला पडलेत. त्याउलट संगणक ते इंटरनेट आणि त्यानंतर आता मोबाइल ते फोर-जी किंवा त्यापुढील माहिती तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी या प्रगत देशांतील शास्त्रज्ञांनी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे. म्हणून त्या देशांमध्ये हे तंत्रज्ञान जेव्हा लोकांच्या हाती जाते तेव्हा त्याच्या वापराची आचारसंहिताही तयार केली जाते, पण तेच संगणक वा मोबाइलवर आधारित आधुनिक तंत्रज्ञान आपल्या देशात येते त्या वेळी त्याच्या ‘वापरा’ऐवजी ‘गैरवापरा’ची शक्यता जास्त वाढते. साधे मोबाइलचेच उदाहरण घेऊया. मोबाइल या एकाच यंत्रामध्ये भ्रमणध्वनी, कॅमेरा, रेडिओ, संगणक, टॉर्च, इंटरनेट, डायरी या तुम्हाला सर्वार्थाने उपयोगी पडतील अशा सुविधा उपलब्ध असतात. ‘सोशल मीडिया’द्वारे तुम्ही मोबाइल म्हणजे ‘गप्पांचा कट्टा’ बनवू शकता. तर दूरच्या प्रवासात मोबाइल तुम्हाला गाणी ऐकवून वा सिनेमा दाखवून मनोरंजन करू शकतो. हे सारे कितीही खरे असले तरी मोबाइलचा वापर किती व कसा करावा याचेही नियम आहेत. मी अमेरिका, जर्मनी, इस्रयल, दक्षिण कोरिया, फ्रान्स आणि बेल्जियमसारख्या प्रगत देशातील विद्यापीठांमध्ये फिरलो आहे. तेथील परिसंवादांमध्ये विद्यार्थ्यांसह सहभागी झालो आहे, पण एकाही कॅम्पसमध्ये मला मोबाइल हातात घेतलेला मुलगा वा मुलगी दिसली नाही. त्यामुळे तेथील कार्यक्रमांमध्ये ‘कृपया तुमचा मोबाइल बंद करा’ अशी उद्घोषणा ऐकायला मिळाली नाही. आपल्याकडे एखाद्या नेत्याची प्रचारसभा असो किंवा एखाद्या नामवंत व्यक्तीची शोकसभा, भयंकर आवाजातील रिंगटोन वाजणारच याची खात्री असते. रेल्वे वा बस प्रवासात तर हे असे मोबाइलधारक म्हणजे मोठा ताप असतो. ते कधी मोठमोठयाने आपला खासगी संवाद जगजाहीर करीत असतात, तर कधी मोबाइलमधील गाणी लोकांना ऐकण्याची सक्ती करतात. जर तुम्ही त्यांना समजवायला गेलात, तर ते तुम्हालाच दोन शब्द ऐकवण्याच्या तयारीत असतात. रस्त्यावर, रेल्वे रूळ पार करताना कानात इयरफोन लावून मोबाइलधारक यमलोकी गेल्याच्या आजवर अनेक बातम्या ऐकल्यात, पण तरीही आमचे लोक सुधारायला तयार नाहीत. गाडी चालवताना मोबाइल कानाला लावून बोलणे हे बेकायदेशीर असले तरी दररोज हजारो भारतीय क्षणाक्षणाला हा कायदेभंग करत असतात. कारण सर्वाना पोलिस पकडू शकत नाहीत आणि पकडले तरी काही मोठी शिक्षा करू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. मध्यंतरी समाजवादी पक्षाच्या एका खासदाराने मोबाइलचे फार समर्पक शब्दांत वर्णन केले होते. तो म्हणतो, ‘मोबाइल हे माणसाला खोटे बोलायला प्रवृत्त करणारे यंत्र आहे.’ तुम्ही तुमच्या आसपासची उदाहरणे पाहा, लोक मोबाइलवर किती सहजपणे खोटे बोलतात. माणूस घरी असेल तर ऑफिसला आहे असे सांगतो. ऑफिसमध्ये गप्पा मारत असेल तरी मीटिंगमध्ये आहे असे सांगतो. बहुतांश वेळा काहीही कारण नसताना मोबाइलधारक खोटे बोलतो आणि नकळतपणे आपल्या संवेदनशील मुलाबाळांवर तेच संस्कार करतो.
आज आपल्या देशात मोबाइल वापरणा-या मुलांची संख्या वेगाने वाढतेय. भारतात लोकसंख्या १४५ कोटी आणि मोबाइलधारक शंभर कोटींहून अधिक अशी स्थिती झाली आहे.
आपल्या देशातील ६० कोटींहून अधिक तरुण वयाची पंचविशी पार न केलेले असल्यामुळे बहुतांश मोबाइलधारक तरुण आहेत. गरीब असो वा श्रीमंत प्रत्येक घरासाठी मोबाइल जणू ‘स्टेटस सिम्बॉल’ प्रतिष्ठेचे प्रतीक बनलाय. या अशा घरातील शाळकरी मुलांच्या मोबाइल वापरासंदर्भात एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. त्यातील निष्कर्ष आमच्या भावी पिढीचे ‘भविष्य’ अधोरेखित करणारे आहेत. महानगरातील १० पैकी ९ विद्यार्थी मोबाइल वापरतात. त्यातील बहुतेकांचा कल स्मार्टफोनकडे असतो. मोबाइलवर इंटरनेटचा वापर करणे त्यांना आवडते. ८७ टक्के मुले सोशल मीडियाद्वारे माहिती मिळवण्याला प्राधान्य देतात. सुमारे ७० टक्के विद्यार्थी ‘ऑनलाइन’ खरेदी करतात. शहरातील कुमारवयीन विद्यार्थ्यांचा इन्स्टाग्राम नंतर फेसबुककडे अजूनही ओढा आहे. महानगरातील विद्यार्थ्यांएवढेच नव्याने शहरीकरण होत असलेल्या निमशहरी भागातील मुलेही मोबाइलचा ‘स्मार्ट’पणे वापर करतात.
ऑनलाइन शिक्षण प्रणालीत मोबाइल हा अत्यंत आवश्यक घटक बनलाय. त्या पार्श्वभूमीवर जर आपण या मुला-मुलींना ते कोणत्या वेबसाइटवर जातात, कोणत्या प्रकारचे व्हीडिओ पाहतात, पालकांना ते मोबाइलला हात लावू देतात की नाही, असे प्रश्न विचारले तर धक्कादायक उत्तरं हाती लागतील. आज तशा पद्धतीने जर शोध घेतला तर उमलत्या पिढीच्या बदलत्या मनोव्यापाराचा अभ्यास करणं सोपं झालं असतं. असा अभ्यास करणे ही आता काळाची गरज बनली आहे.
सध्याच्या बदलत्या युगात माहिती-तंत्रज्ञानाने माणसांच्या जगण्याचा साचा पार बदलून गेला आहे. कौटुंबिक नातेसंबंधांची चौकट चार दिशांना फेकली जात आहे. परिणामी संगणक-मोबाइलच्या माध्यमातून माणसे ‘व्हॅर्च्युअल वर्ल्ड’ , “मेटाव्ह्रर्स”, अशा आभासी विश्वात जगण्यासाठी स्थलांतरित होण्याचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे मोबाइल गेम्स असो वा सोशल मीडियावरील दिखाऊ, उथळ प्रेम, या सगळ्यांचा आमच्या संपूर्ण समाजावर परिणाम होत आहे. संपर्क आणि संवादाच्या या बदलत्या संदर्भाचा जर आपण वेळीच समन्वय साधला नाही, तर आज वरवरचे वाटणारे प्रश्न त्सुनामीसारखे उसळून अंगावर येतील..तुम्हाला तसे वाटत नाही, तसं होणं आपल्या हिताचे नाही. मग आपण काय केले पाहिजे, तर आपण आपल्या वाडवडिलांची जीवनदृष्टी काळाच्या कसोटीवर घासून स्वीकारली तरच आपण या संक्रमण अवस्थेतून सुखरूप बाहेर पडू शकतो. ज्ञानेश्वर माऊली एका ओवीत ते कसे करावे याबद्दल फार मार्मिक भाष्य करतात, “का आपुला ठावो न सांडिता, आलिंगिजे चंद्रु प्रकटिता” , म्हणजे जशी तलावात फुललेली कमलिनी आपली जागा , आपली मुळे नसोडता आकाशात प्रगटलेल्या पूर्णचंद्राला मिठी मारते, अगदी त्याच पद्धतीने जर आपण आपल्या कृषिप्रधान ग्रामीण संस्कृतीतील चांगल्या गोष्टींची मुळे घट्ट धरून जर आधुनिक ज्ञान तंत्रज्ञान संपादन करण्याचे ठरवले तर आज आपणांस आव्हानात्मक वाटणारे प्रश्न सहज सुटत जातील, आणि मग आपण कुठल्याच मेकअप शिवाय, मोबाइल ॲप शिवाय जीवनातील सौंदर्य पाहू शकु. आमच्यात शिरलेली भपकेबाज दिखाऊ वृत्ती कमी होईल. “दुसरे काय म्हणतील”, हा जो विचार सदैव आमच्या मनात घर करून राहतो, तो फुकटचा भाडेकरु निघून जाईल. मुख्य म्हणजे मन शांत होईल आणि जीवन सुंदर होईल.
शरद भाऊ बुट्टे पाटील यांनी मोठ्या कष्टाने संकलित केलेल्या या लेखसंग्रहात आपल्या गावातील, जीवन प्रवासातील आठवणींची अधिक जोड दिली असल्याने . हे ललितलेखन वाचताना सह अनुभूतीचा अनुभव येतो. फेसबुकवरून सहज म्हणून सुरु झालेला हा ललित लेखन प्रवास असाच सुरु राहो. त्यासोबत शरद भाऊंनी ग्राम विकास आणि राजकारण या विषयावर दीर्घ लेखन केले पाहिजे. त्यांच्या व्यापक अनुभवाचा नवीन पिढीला लाभ झाला पाहिजे.
महेश म्हात्रे
- संपादक – संचालक, महाराष्ट्र रिसर्च सेंटर
Leave a Reply