यमुना नदी स्वच्छतेसाठी जनआंदोलनाची हाक; पंतप्रधान मोदींचे निर्देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी गुरुवारी उच्चस्तरीय बैठकीचे नेतृत्व केले. या बैठकीत पंतप्रधानांनी संबंधित अधिकाऱ्यांना यमुना पुनरुज्जीवन मोहिमेला जनआंदोलनाचे स्वरूप देण्याचे ठाम निर्देश दिले. यासाठी उपग्रह चित्रणासह आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावरही त्यांनी भर दिला.

दिल्ली सरकारच्या एका निवेदनानुसार, पंतप्रधानांनी यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी जनभागीदारीला प्रोत्साहन देण्याचा आदेश दिला. त्याचबरोबर नदीच्या पुनरुज्जीवन आणि जनजागृतीसाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्याची सूचना केली. यमुना नदीच्या दिल्लीतील परिसराबरोबरच सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध ब्रज प्रदेशाला देखील विशेष महत्त्व देण्याची मागणी केली, ज्यामुळे ‘ब्रज यात्रा’ उपक्रम या मोहिमेचा भाग होऊ शकेल. ही बैठक पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी पार पडली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, यमुना नदीच्या प्रदूषणाचा आणि तिच्या स्वच्छतेचा मुद्दा भाजपने प्रमुख ठेवला होता. ५ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या मतदानानंतर भाजपला सत्ता मिळाल्यानंतर, ८ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात “यमुना मय्ये की जय” अशी घोषणा करून केली होती.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *