राहुल गांधींच्या आरोपांना फडणवीसांचं सडेतोड प्रत्युत्तर: “झुठ बोले कौवा काटे!”

मुंबई: महाराष्ट्रातील मतदार यादीतील वाढीव संख्येवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “झुठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो,” अशा मिश्किल पण धारदार शब्दांत फडणवीस यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. महाराष्ट्रातील दारुण पराभवामुळे राहुल गांधींचा त्रास दिवसेंदिवस वाढत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “झुठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो.. मान्य आहे की महाराष्ट्रात दारुण झालेल्या पराभवाची तुमची वेदना दिवसागणिक वाढत आहे. पण आपण असं किती काळ हवेत बाण सोडत राहणार आहात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राहुल गांधींकडून सतत होत असलेल्या टीकेला त्यांनी यावेळी उत्तर दिलं.पुढे बोलताना फडणवीस यांनी राहुल गांधींना काँग्रेसमधील त्यांच्याच नेत्यांशी संवाद साधण्याचा सल्ला दिला. “तुमच्याच पक्षातील विकास ठाकरे, नितीन राऊत, अस्लम शेख यांच्याशी हे ट्विट करण्यापूर्वी बोलायचं होतं. किमान कॉंग्रेसमध्ये संवादाचा अभाव इतक्या उघडपणे दिसून आला नसता,” असा खोचक टोला फडणवीसांनी राहुल गांधींना लगावला. यातून त्यांनी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांवरही बोट ठेवलं. राहुल गांधी यांनी मतदारांच्या संख्येवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर, त्यावर तात्काळ फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. फडणवीस यांच्या या प्रत्युत्तरामुळे आता काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *