गडचिरोलीत ‘या’ क्षेत्रात होणार ५,२०० कोटी रुपयांची गुंतवणूक; दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या जागतिक आर्थिक फोरम परिषदेत सहभागी होण्यासाठी दावोस दौऱ्यावर गेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या बहुचर्चित दौऱ्यामधून राज्यात हजारो कोटींची गुंतवणूक होणार असून कालपासून अनेकांच्या गाठीभेटी घेत मुख्यमंत्र्यांनी या दौऱ्याचा श्रीगणेशा केला आहे. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस परिषदेतून पहिल्या करारावर स्वाक्षरी करत गडचिरोली जिल्ह्यासाठी सर्वात मोठं गिफ्ट दिलं आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दावोस येथे सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून महाराष्ट्रासाठी पहिला सामंजस्य करार झाला असून मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली जिल्ह्यासाठी मोठे गिफ्ट दिलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात पोलाद निर्मितीसाठी कल्याणी समूहाकडून  ५,२०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.  कल्याणी समूह आणि महाराष्ट्र राज्य शासनामध्ये स्टील आणि संरक्षण क्षेत्रात करार करण्यात आला आहे. या माध्यमातून पोलाद उद्योगासाठी ५ हजार २०० कोटी रुपयांची गुंतवणूक गडचिरोलीमध्ये केली जाणार आहे. या करारामधून तब्बल 4 हजार रोजगार निर्मितीही होणार आहे. कल्याणी समूहाचे प्रमुख अमित कल्याणी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत हा करार केला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंतही उपस्थित होते. दावोस येथील परिषदेच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक अध्यक्ष क्लॉस श्वाब यांची भेट घेतली. या परिषदेतून महाराष्ट्रात सुमारे सात लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार होण्याची अपेक्षा आहे, ज्यामधील पहिला करार गडचिरोलीसाठी करण्यात आला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलवादी भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करत अनेक उद्योगधंदे आणण्याचा शब्द दिला होता. त्यांच्या या दौऱ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विरोधकांनीही कौतुक केले होते.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *