राजकीय टीका व विडंबनावर आधारित मनमानी एफआयआर टाळण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांची मागणी फेटाळली; उच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार

राजकीय विडंबन आणि टीका करणाऱ्या कलाकार व सार्वजनिक व्यक्तींना मनमानी प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) पासून संरक्षण देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात यावीत, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली. ही याचिका विनोदकार कुणाल कामरा यांच्या विरोधात नोंदवण्यात आलेल्या एफआयआरच्या पार्श्वभूमीवर दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केले की, “कुणाल कामरा हे ना अशिक्षित आहेत, ना न्यायालयीन प्रक्रियेत अपंग आहेत. त्यांनी चेन्नई येथील न्यायालयासह उच्च न्यायालयात विविध दिलासांसाठी अर्ज केले आहेत. अशा परिस्थितीत या प्रकरणात तृतीय पक्षाचा हस्तक्षेप आवश्यक कशासाठी?” असा सवाल न्यायालयाने विचारला. ही याचिका दुसऱ्या वर्षातील कायदाशास्त्राच्या विद्यार्थ्याने दाखल केली असून, त्याच्या वतीने अधिवक्ता अमित कटारनवरे यांनी बाजू मांडली. या याचिकेच्या संदर्भात कटारनवरे यांनी सांगितले की, “कामरा यांच्या विडंबनात्मक गाण्यानंतर आणि कार्यक्रमस्थळी झालेल्या तोडफोडीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान केले होते की, हे गाणे पुन्हा पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई होईल. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.”

 

सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी यावर उत्तर देताना स्पष्ट केले की, “फक्त गाणे पोस्ट केल्यामुळे अटक झाल्याचा एकही घटनात्मक दाखला उपलब्ध नाही.” या याचिकेमध्ये भारतीय संविधानाच्या कलम १९ अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची मागणी करण्यात आली होती. कामरा यांच्या विनोदी गाण्याच्या आधारे याचिकाकर्त्याने असा युक्तिवाद केला की, हे भाष्य विडंबन आणि राजकीय टीकेच्या चौकटीत येते व त्यामुळे त्यास घटनात्मक संरक्षण लाभते.

 

उल्लेखनीय म्हणजे, हे वादग्रस्त गाणे १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल तो पागल है’ चित्रपटातील एका गाण्याच्या विडंबनावर आधारित आहे. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर व भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रीपद मिळवल्यानंतर, या गाण्याच्या प्रसारणानंतर शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी खारमधील ‘हॅबिटॅट स्टुडिओ’मध्ये तोडफोड केली होती. याचिकाकर्त्याने असा युक्तिवाद मांडला की, लोकशाही व्यवस्थेमध्ये राजकीय व्यंगचित्रे व टीका यांना मोलाचे स्थान आहे. त्यामुळे अशा अभिव्यक्तींवर बंदी घालणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात होय. त्यामुळे कलाकार व सार्वजनिक वक्त्यांवर मनमानी एफआयआर दाखल होऊ नयेत यासाठी ठोस मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात यावीत, तसेच कामरा यांच्या गाण्याला लाईक, शेअर किंवा पुन्हा प्रसारित करणाऱ्यांना कायदेशीर संरक्षण मिळावे, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली होती.

 

तसेच, वेगवेगळ्या मतप्रदर्शनांना गुन्हेगारी स्वरूप देण्याची वाढती प्रवृत्ती आणि राजकीय व्यंगचित्रकारांना लक्ष्य करण्यासाठी यंत्रणांचा वापर केला जात असल्याबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि हिंसक भाषण यामधील फरक ओळखण्यासाठी ठोस कायदेशीर चौकट असावी, अशीही मागणी करण्यात आली. मात्र, उच्च न्यायालयाने या सर्व मागण्यांना स्पष्ट नकार देत याचिका ग्राह्य धरण्यास नकार दिला.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *