मनोज जरांगे यांना मराठा संघटनांकडून एकटे पाडण्याचा प्रयत्न; सुरेश धस मदतीला धावले

मराठा आरक्षणाच्या लढ्यात मनोज जरांगे पाटील एकटे पडत आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, कोल्हापुरात एकत्रित आलेल्या ४२ मराठा संघटनांनी स्पष्ट केले की, त्यांची मागणी जरांगे पाटील यांच्या मागण्यांपेक्षा वेगळी आहे. त्यामुळेच त्यांना ठरवून एकटे पाडले जात असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
कोल्हापुरात राज्यस्तरीय परिषद घेऊन मराठा संघटनांनी आरक्षणाच्या लढाईसाठी नव्याने दिशा ठरवली आहे. तर दुसरीकडे, जरांगे पाटलांनीही मराठवाड्यात मोठी परिषद जाहीर केली असून, याला त्यांना मिळालेला शह मानले जात आहे.
जरांगे पाटील यांची कोंडी होत असताना, भाजप आमदार सुरेश धस त्यांच्या मदतीला धावून आले आहेत. “एखाद्या जिल्ह्यात कार्यक्रम झाला आणि त्यात जरांगेंना बोलावले नाही, तर त्याचा गैरअर्थ काढू नका,” असे स्पष्टीकरण धस यांनी दिले.
कोल्हापुरातील अधिवेशन हे स्थानिक स्वरूपाचे होते आणि त्याला जिल्ह्यापुरतेच महत्त्व असल्यामुळे जरांगेंना निमंत्रण दिले गेले नाही, असेही त्यांनी सांगितले.
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा नव्या उर्जेने संघटना एकवटल्या आहेत. जरांगे पाटलांनी मराठ्यांची ताकद एकत्र करून सरकारवर दबाव टाकला, मात्र त्यांच्या बदलत्या भूमिकेमुळे हा लढा कोणत्या दिशेने जात आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
मराठा क्रांती मोर्चासारखी ताकद दाखवलेल्या संघटना पुन्हा एकत्र आल्या आहेत. शिवसंग्राम, अखिल भारतीय मराठा सेवा संघ, राष्ट्रीय मराठा महासंघ, मराठा आरक्षण समन्वय समिती, मराठा क्रांती ठोक मोर्चा यांसह ४२ संघटनांनी कोल्हापुरात राज्यव्यापी बैठक घेत पुन्हा एल्गार पुकारला. सरकारला १० मार्चपर्यंतचा अल्टिमेटम देत त्यांनी आपल्या लढ्याला अधिक धार दिली आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *