मुंबईत दररोज सुमारे ९,८४१ टन घनकचरा निर्माण होतो, असे स्वच्छ महाराष्ट्र मिशनच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अहवालानुसार हा आकडा फक्त ६,५१४ टन असल्याचा दावा करण्यात आला आहे. या दोन्ही अहवालांमध्ये मोठी तफावत आढळून येत असल्याने मुंबईतील कचरा व्यवस्थापनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कॅग महालेखापाल आणि नियंत्रकच्या(CAG) अहवालानुसार, २०२१-२२ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका ने प्रतिदिन सरासरी ६,२१३ टन कचरा गोळा केला होता. हा अहवाल महाराष्ट्र विधानसभा सत्रात सादर करण्यात आला असून, मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या आणि स्वच्छ महाराष्ट्र मिशनच्या आकडेवारीतील मोठ्या फरकावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या अहवालानुसार –
• ६,५१४ टन कचरा दररोज निर्माण होतो.
• त्यापैकी ६,२२८ टन कचरा गोळा केला जातो.
• ५,८२९ टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.
तर, स्वच्छ महाराष्ट्र मिशनच्या अहवालानुसार –
• ९,८४१ टन कचरा दररोज निर्माण होतो.
• केवळ ६,२१३ टन कचरा गोळा केला जातो.
• फक्त ४,८७० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.
या दोन्ही आकडेवारीत सुमारे ४०% हून अधिक तफावत असल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या कचरा व्यवस्थापन प्रक्रियेवर संशय व्यक्त केला जात आहे.
महालेखापाल आणि नियंत्रक (CAG) अहवालानुसार, केवळ मुंबईच नव्हे, तर इतर आठ शहरी स्थानिक संस्थांच्या अहवालांमध्येही मोठ्या विसंगती आढळल्या आहेत. शहरात प्रत्यक्ष किती कचरा निर्माण होतो आणि त्यावर किती प्रमाणात प्रक्रिया केली जाते, याचा अचूक अंदाज घेणे महत्त्वाचे आहे. स्थानिक प्रशासनाने प्रभावी व्यवस्थापनासाठी स्पष्टता आणली पाहिजे, अन्यथा कचरा नियोजनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल.
महत्वाचे म्हणजे, बृहन्मुंबई महानगरपालिका कडून ऑक्टोबर २०२३, ऑगस्ट २०२४ आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये लेखापरीक्षणांमध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्यांना अद्याप कोणताही स्पष्ट प्रतिसाद देण्यात आलेला नाही.
नोव्हेंबर २०२४ पर्यंतही बृहन्मुंबई महानगरपालिका ने याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. या विसंगतींमुळे महानगरपालिकेच्या कार्यपद्धती आणि पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
तज्ज्ञांच्या मते, बृहन्मुंबई महानगरपालिका ने तातडीने या प्रकरणात स्पष्टीकरण द्यावे आणि अधिक विश्वासार्ह व पारदर्शक प्रणाली लागू करावी, जेणेकरून कचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी करता येईल.
Leave a Reply