पाणीटंचाईच्या छायेत असलेल्या मुंबईकरांसाठी आशेचा किरण ठरू शकणारा गारगाई धरण प्रकल्प अद्याप प्रत्यक्षात उतरण्यास काही वर्षे दूर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात यासंदर्भात आढावा बैठक घेऊन प्रक्रियेला गती देण्याचे संकेत दिले, मात्र प्रत्यक्षात पाणी मिळायला अजून किमान पाच ते सहा वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईला सध्या सात धरणांवर पाणीपुरवठा अवलंबून आहे. मात्र, गेली तीन वर्षे पावसाळ्यापूर्वीच पाणीकपात लागू करावी लागत असल्यामुळे गारगाई प्रकल्पाला प्राधान्य देण्यात आलं आहे. वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळ हे धरण उभारण्यात येणार असून, रोज ४४० दशलक्ष लिटर पाणी मुंबईला मिळण्याची अपेक्षा आहे.
गारगाई प्रकल्पाची अंमलबजावणी करताना तानसा अभयारण्याचा काही भाग बाधित होणार असल्यामुळे वन्यजीव मंडळ आणि वन विभागाच्या परवानग्या आवश्यक आहेत. या परवानग्यांसाठी महापालिकेने २०२० मध्येच अर्ज केले होते. मात्र, अद्याप मंजुरी मिळालेली नाही. परवानग्या मिळायला अजून सहा महिने लागू शकतात आणि त्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला किमान चार वर्षे लागतील, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या प्रकल्पामुळे ६१९ कुटुंबे बाधित होणार असून त्यासाठी पालिकेने २५७ कोटींच्या भूसंपादन आणि पुनर्वसन खर्चाचे नियोजन केले आहे. प्रकल्पामुळे बाधित होणारी सहा गावे देवळी गावात स्थलांतरित करण्यात येणार आहेत. त्यांना जमीन, मोबदला आणि एका कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचं आश्वासन पालिकेने दिलं आहे.
या धरणामुळे तानसा अभयारण्यातील माणसांचा वावर कमी होणार असून, जंगल संरक्षणाला मदत होणार आहे. राज्य महामार्गाचं मार्गवळण, चार अंशतः बाधित गावे अभयारण्याबाहेर काढणं आणि वन क्षेत्राचं संरक्षण अशा पद्धतीने नियोजन केलं जात आहे.
गारगाई प्रकल्पाचे महत्त्वाचे तपशील –
• प्रकल्प खर्च (२०१९ नुसार): ₹३१०० कोटी (वाढीची शक्यता)
• दैनंदिन पाणी पुरवठा: ४४० दशलक्ष लिटर
• बाधित क्षेत्र: ८४० हेक्टर, त्यापैकी ४२६ हेक्टर खाजगी जमीन खरेदी
• बाधित गावे: ओगदे, खोडदे (पूर्ण), तिळमाळ, पाचघर, फणसगाव, आमले (अंशतः)
• भूसंपादन व पुनर्वसनाचा खर्च मिळून पालिकेला २५७ कोटींचा खर्च येणार आहे.
• वनविभागालाही जमिनीचा मोबदला द्यावा लागणार आहे.
Leave a Reply