माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न, न्यायालयात उत्तर देईन-आदित्य ठाकरे

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन प्रकरणात त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळले असून, हे त्यांच्या प्रतिमेला धक्का देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. या आरोपांना उत्तर न्यायालयात देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे वक्तव्य त्यांनी गुरुवारी केले, एक दिवस आधी दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी बॉम्बे उच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्यांच्या मुलीच्या मृत्यूच्या परिस्थितीबाबत नव्याने तपासाची मागणी केली होती. या याचिकेत ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून, तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशीही मागणी सतीश सालियन यांनी पत्रकारांना सांगितली. याचिकेत असा आरोप करण्यात आला आहे की, प्रभावशाली लोकांना वाचवण्यासाठी राजकीय हेतूने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. “गेल्या पाच वर्षांपासून माझी प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही आमचा पक्ष न्यायालयात मांडू आणि तेथेच या आरोपांना उत्तर देऊ.” असे ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दिशा सालियन प्रकरण; काय घडले होते?

दिशा सालियन यांचा ८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड येथील एका निवासी इमारतीच्या १४व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला मुंबई पोलिसांनी याला अपघाती मृत्यू मानून नोंद केली होती. या घटनेच्या सहा दिवसांनंतर, १४ जून रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आपल्या बँड्रा येथील घरात मृत अवस्थेत आढळले. या प्रकरणाचा तपास झाल्यानंतर त्याने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा हवाला देत सांगितले की, “एखाद्या व्यक्तीवर बलात्काराचा आरोप असेल, तर त्याला अटक झाली पाहिजे.” तसेच, ठाकरे यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली.

यावर उत्तर देताना, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर आरोप करत म्हटले की, “ठाकरे यांच्यावर राजकीय हेतूने आरोप लावले जात आहेत. सरकारने तपास करावा, आम्हाला त्याची भीती नाही.”

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील या प्रकरणाच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विचारले की, “पाच वर्षे दिशा सालियन यांचे वडील शांत का होते? हे राजकीय हेतूने उचललेले प्रकरण आहे.”

दिशा सालियनच्या मृत्यूबाबत नव्याने चर्चेला उधाण आले असतानाही मुंबई पोलिसांनी सांगितले की, त्यांच्या तपासात कोणतीही संशयास्पद बाब आढळलेली नाही.

डिसेंबर २०२३ मधील महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनात भाजप नेते नितेश राणे यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर राज्य सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले. मात्र, SIT कडून वारंवार समन्स पाठवूनही, आरोप करणारे—यामध्ये सालियन यांचे कुटुंबीय आणि राणे यांचा समावेश होता. आपले जबाब नोंदवायला आले नाहीत, त्यामुळे तपास बंद करण्यात आला.

मुंबई पोलिसांनी २०२१ मध्येच आपला तपास पूर्ण करून सांगितले होते की, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या सीबीआय चौकशीतही दिशा सालियनच्या मृत्यूबाबत कोणताही संबंध किंवा गुन्हेगारी कृत्याचा पुरावा आढळलेला नाही.

सोशल मीडियावर फिरत असलेल्या, “दिशा सालियन एका पार्टीला गेली होती,” किंवा “ती गर्भवती होती,” अशा दाव्यांचा पोलिसांनी खंडन केले असून, सीसीटीव्ही फूटेज, शवविच्छेदन अहवाल आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांमधून हे आरोप चुकीचे ठरले आहेत. एका तपास अधिकाऱ्याने सांगितले की, दिशा सालियन आर्थिक नुकसानीमुळे नैराश्यात होती आणि तिच्या मृत्यूच्या रात्री तिथे असलेल्या मित्रांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला होता. तसेच, “ती नग्न अवस्थेत आढळली” हा दावा तिच्या वडिलांनीच फेटाळला होता.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *