पराभवानंतरच राहुल गांधींना इव्हीएम मध्ये दोष दिसतो

भाजप नेते आमदार डॉ. परिणय फुके यांचा टोला : मंथन करण्याचा दिला सल्ला

नागपूर : काँग्रेस पक्ष ज्यावेळी निवडणूक जिंकते, त्यावेळी त्यांची भूमिका वेगळी असते. परंतु एखादी निवडणूक हरली तर काँग्रेस नेते राहुल गांधी इव्हीएमवर, निवडणूक आयोगावर किंवा मतदार याद्यांवर खापर फोडतात. मुळात त्यांनी पराभवावर मंथन करण्यासाठी वेळ काढावा. राहुल गांधी यांचे ‘नाचना न जाने आंगण तेढा’ असे झाले आहे, असा टोला भाजप नेते आमदार डॉ. परिणय फुके यांनी आज लागवला.
काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत 70 लाख मतदार वाढल्याचा आरोप केला होता. त्याला सडेतोड उत्तर देताना आमदार डॉ. फुके यांनी राहुल गांधी यांना तेलंगाणा व लोकसभेतील यशाची आठवण करून देत त्यावेळी इव्हीएम चांगले होते का, असा सवाल केला. त्यावेळी आरोप केला नाही, आता विधानसभेत महाराष्ट्रातील जनतेने त्यांना नाकारल्यानंतर लगेच इव्हीएम, निवडणूक आयोग अन मतदार याद्यांवर आरोप करणे सुरु केले. मुळात राहुल गांधी यांचे ‘नाचना न जाने आंगण तेढा’ असे सुरु आहे. त्यांनी आपल्या स्थानिक नेत्यांसोबत पराभवावर विचार, चिंतन करायला वेळ काढावा, असा खोचक सल्लाही डॉ. फुके यांनी दिला.                        लोकसभेतील पराभवानंतर आम्ही एकत्रित बसून चुकांचा शोध घेतला. आमचे मार्गदर्शक मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आमचे नेते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे किंवा कुणीही इव्हीएमवर आरोप केले नाही. आम्ही चिंतन केले, ज्या चुका झाल्या, त्या दुरुस्त करून विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलो. त्यामुळे आम्हाला मोठे यश मिळाले. निवडणुकीला सामोरे जाताना हीच प्रक्रिया होत असते. काँग्रेस नेते व राहुल गांधी यांनी कुठे चुकलो याचा शोध घ्यावा अन हवेत इमले तयार करणे सोडावे, असा सल्ला आमदार डॉ. परिणय फुके यांनी दिला.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *